Hard Copy Price:
25% OFF R 80R 60
/ $
0.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
कथा-कादंबरीकार, पत्रकार व वक्ते म्हणून परिचित असलेले उत्तम कांबळे एक कवी म्हणून या संग्रहाद्वारे वाचकांसमोर येत आहेत. वास्तविक गेली तीस वर्षे श्री. कांबळे हे कविता लिहिणे, फाडणे, पुन्हा लिहिणे; पण प्रसिद्ध न करणे हा उद्योग करीत होते. प्रस्तुत संग्रह प्रकाशित झाला, तो श्री. विलास वाघ यांच्या कृपेने...! संग्रहाचा रुंदसा आडवा आकार, रेखाचित्रांनी सजलेल्या कविता, जागतिकीकरणाचा भूगोल व त्यावर पिवळे फूल घेऊन झेपावणारे शुभ्र कबूतर असलेले मुखपृष्ठ, प्रा. यशवंत मनोहरांची १९ पृष्ठांची प्रस्तावना व कवीचे छोटेसे मनोगत, असा या संग्रहाचा एकूण दर्शनी साज आहे.
या संग्रहात लहान-मोठ्या तीस कविता आहेत. या तीस कविता व त्यांचा कवी समकालीन दारुण मनुष्यकलहात सैरभैर झालेला आहे. निसर्ग व माणूस या दोहोंवर विषम व विपरीत लढा लढणारे जागतिकीकरण हे त्या मनुष्यकलहांचे केंद्र आहे. बाबरी मशिदीचा विध्वंस, मूलतत्त्ववादी धार्मिक प्रणाली, जातीयता, स्त्रीजीवनाची विटंबना, दारिद्यर, संगणकीय आक्रमण, महापुरासारखी नैसर्गिक आपत्ती, ग्रामजीवनाचा र्हास व विकृतीकरण आणि जागतिकीकरणाच्या फेर्यात अडकून पडलेला ग्रामीण कृषिकेंद्रित समाज इत्यादींचा एका जागृत विचारप्रधान संवेदनशीलतेने साधलेला हा अस्वस्थ करणारा आविष्कार आहे. समकालीन संस्कृतिटीका असणारे हे काव्यात्म वैचारिक आहे. समाजदक्ष मानसिकता व लोकाभिमुख कवित्व यांचा या संग्रहातील मेळ मराठी काव्यपरंपरेच्या सत्त्वधारेशी सुसंगतही आहे. नव्या वास्तवाचा कल्पकतेने मर्मवेध घेणारे हे तल्लख कवित्व आहे.
"हे नारायणा' ही कविवर्य नारायण सुर्वे यांच्याविषयीची गौरवपर उद्देशिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. "अशी का वागताहेत झाडे?' यातली सूचक कल्पकता व्याकुळ करणारी आहे. जागतिकीकरणावरील १७ खंडांची दीर्घ कविता आशय व आवेग यांनी भारून टाकणारी आहे. "माझी गरीब माऊली,' "साडी,' "राणी' यातील आत्मभान प्रभावी आहे. "मनुष्यस्थाने इतकी कमी का?' हा जागतिकीकरणातील या कवितेचा व कवीचा मूलभूत सवाल आहे. या जगात आता विश्रांतीसाठी बोधिवृक्ष उगवत नाही, हा तिचा निर्वाणीचा निष्कर्ष आहे. श्री. उत्तम कांबळे यांची ही कविता कोणत्याही विचारप्रणालीच्या गवसणीत मावणार नाही. निव्वळ माणूसपण रक्षिण्यासाठी "रेड ऍलर्ट' घोषित करणारी ही मुक्त संदेशवाहिनी आहे.