Summary of the Book
जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या काळात आर्थिक, सामाजिक, धार्मिक व अन्य अनेक क्षेत्रात अनेक बाबतीत मागासलेपण, अभद्रता, अंधश्रद्धा होती. त्यांच्या संवेदनशील मनाला हे पाहवत नव्हते. त्यांच्या सर्वसामान्यांचे गुरफ़टलेपण आणि भरडले जाणे त्यांना सहन होत नव्हते. ढोंगी-लफंगे, साधू-बुवा-बाबा, बैरागी व अन्य दुसरेही भोळ्या भाबड्या रयतेचा विविध प्रकारे फायदा घेत होते. 'बुडती हे जन देखवेना डोळा, म्हणुनी कळवळा वाटतसे' या भावनेतून ते कथा-कीर्तने-अभंगाद्वारे 'लोकजागर' करीत होते.
ह्या आचाविचारसरणीला अनुसरून अमंगल, अभद्र, अंधश्रद्धाळू प्रवृत्तींवर 'रोखटोख' या भाषेत त्यांनी प्रहार केले. परंतु त्यांच्या या कृतीत विद्रोहीपणा नव्हता. खोट्या अमंगल, अपवित्र, अभद्र गोष्टींचा नाश करून तेथे 'सत्यम-शिवम-सुंदरम' ची स्थापना करणे, 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हा मनोभाव वाढीस लावणे हि त्यांची भूमिका होती.