Summary of the Book
पाटकर यांच्या कथांतून दिसणारे जग मला तसे अपरिचित नाही. मराठी साहित्यालाही आता हे जग तसे परके राहिलेले नाही. तरीही या जगाविषयीच्या या संग्रहातील कथांच्या वाचनाने मला त्यातली काही परिचित चेहर्यांची माणसे नव्याने कळताहेत किंवा मी त्या माणसांकडे नव्यानेच पाहतो आहे असे वाटले, हे लेखक असूनही, मोकळेपणाने कबूल केले पाहिजे. माणसे आणि त्यांची परिस्थिती यांच्याविषयीची माझी जाण या कथांमुळे निश्चितपणे वाढली आहे. परिचित गोष्टींचा नव्याने विचार करण्याला लावते ते चांगले साहित्य असे मानले तर या कथा त्या वर्गातल्या आहेत असे मी म्हणेन.
पाटकरांचे समाजशास्त्र खुर्चीतले किंवा फळ्यासमोरचे नाही. आपली शास्त्रीय समज घेऊन आज ते आदिवासींमध्ये काही सहकार्यासमवेत प्रत्यक्ष काम करीत आहेत, हाही तपशील महत्त्वाचा आहे. त्यांची सामाजिक जाण एकीकडे शास्त्रीय पायावर त्याचबरोबर एका उत्कटपणे घेतलेल्या समाजातल्या विविध थरांतल्या अनुभवांवर आधारलेली आहे.
या नव्या स्तोत्राचे दिलखुलास स्वागत मराठी वाचक करतील असा विश्वास वाटतो.
श्री. विजय तेंडुलकर यांच्या प्रस्तावनेतून