Summary of the Book
कवीचा भवताल कवितेत येतो तो जसाच्या तसा येत नाही. त्या भवतालच्या व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांसह येतो. पद्मरेखा धनकर यांच्या कवितेत हा भवताल आलेला आहे. त्यात त्यांचं माणूस असणं,स्त्री असणं , कवी असणं घुसळून निघालेलं आहे. त्यातून या संग्रहातल्या कवितांनी आकार घेतलेला आहे . सध्याच्या भवतालाचं एक रूप झुंडीच्या भीतीच्या रूपानं येतं. जरासा गलका झाला की आताशा चर्र होतं मन अशी ही स्थिती आहे . सर्वत्र विषवृक्षाच्या मुळ्या पसरत चाललेल्या आहेत अशी जाणीव व्यक्तीला होत राहते . या स्थितीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्यालाच बाहेर पाडावं लागेल याचीही जाणीव होते. या समाजव्यवस्थेत व्यक्तीला दोरांनी कसं जखडून ठेवलेलं आहे हेही जाणवत राहतं. जरा दोर सैल झालेला असतो काही काळ, पुन्हा त्यानं जखडलं जातं. हे वास्तव या संग्रहातल्या कवितांतून थेटपणे व्यक्त झालेलं आहे. सबंध समाजच जेव्हा कोंडवाड्यासारखा असतो, तेव्हा व्यक्तीव्यक्तींमधले बंधही जखडल्यासारखे होतात. दुखरे पंख मिटून घेण्याशिवाय दुसरा उपाय नसतो.