Summary of the Book
या छोटय़ाशा पुस्तिकेचे नाव ‘भारत - काल, आज आणि उद्या’ असे आहे, आणि यातील तिन्ही मान्यवरांचे लेख हे प्रत्यक्षात त्यांनी कॉ. यशवंतराव चव्हाण यांच्या नव्वदीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिलेली भाषणे आहेत.
रामचंद्र गुहा यांचे भाषण क्रिकेट या त्यांच्या आवडीच्या विषयावर आहे. त्यांनी ‘अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फिल्ड’ या आपल्या बहुचर्चित पुस्तकाचे लेखन करून सामाजिक इतिहास आणि क्रिकेट असे दोन विषय पहिल्यांदाच एकत्र आणले. त्यातून पुढे आलेले निष्कर्ष, अनुभव त्यांनी या भाषणात सांगितले आहेत.
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी भारताच्या कालविषयी बोलताना आपण नेमकं कुठलं साल जमेस धरतो, 1947, 1950, 1975 अशी भाषणाची सुरुवातच केलेली आहे. आणि मग त्यांनी संबंध भाषणात ‘काल’च्या भारतात काय काय बदल झाले, आणि त्याचबरोबर त्या वेळी जगात काय बदल होत होते याचा समर्पक असा आढावा घेतला आहे. ‘वास्तवाचं कठोरपणे आकलन करणं, सतत नवं शिकत राहणं आणि (वेळ पडल्यास) शिकलेलं पुसून टाकणं याची आपण तयारी ठेवायला हवी.’ असा त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला आहे.
नंदन नीलकेणी यांनी पूर्णपणे तंत्रज्ञान आणि विकास यांची सर्वसमावेशकता या विषयावर आपला भर ठेवला आहे. युनिक आयडेंटिटी नंबरमुळे काय काय फायदे होऊ शकतात, सरकारी कामकाजाच्या वेळी होणारा वेळेचा अपव्यय कसा थांबू शकतो, याचीही मांडणी त्यांनी केली आहे. उद्याच्या तंत्रज्ञानाचा प्रवास कसा असेल याचा धावता आढावा त्यांच्या या भाषणात पाहायला मिळतो.
मूळ इंग्रजीत असलेल्या या भाषणांचा मराठी अनुवादही तुलनेने चांगला झाला आहे. त्यामुळे ही पुस्तिका वाचनीय झाली आहे.