Summary of the Book
या कथांमधील पात्रांचे हे धाडसी निर्णय आणि कृती बरेचदा नैतिक आणि अनैतिक या संकल्पनांची चर्चा छेडतात. तत्त्वच्युत झालेल्या पतीपासून अलग होऊन विचारपूर्वक दुसऱ्या विचारी आणि आवडीनिवडींचे सुत जमू शकणाऱ्या पुरुषाशी नवे सहजीवन सुरु करणाऱ्या स्त्रिया या कथांमधून भेटतात. सरधोपटपणे वागणारा समाज दुसरा विवाह करणाऱ्या स्त्रीकडे फारशा आपुलकीने पाहत नाही. त्यात आधीचा संसार मोडून दुसरी निवड केली असेल, तर नाहीच नाही.पण जगधने यांनी उभी केलेली स्त्रीपात्रे काही एका विचारातून , नैतिक भूमिकातून हा निर्णय घेताना दिसतात. हे वाक्य चमत्कारिक वाटेल , परंतु मूल्यांशी प्रामाणिक असण्याची नैतिकता पाहणे महत्वाचे वाटल्यानंतर केवळ बाह्य समाजाला अनैतिक वाटेल असे दडपण मनावर येऊ न देता आपल्या जगण्याला पर्याय देण्याचे धाडस त्या दाखवतात. स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधणारी माणसेही या कथात भेटतात आणि या माणसांना त्यांची योग्य जागा दाखवून देणाऱ्या स्त्रियाही !
समाजपरिवर्तनाच्या चळवळींना ग्रासणाऱ्या व्यक्तिवादावर , व्यक्तींच्या कमतरतांवर , वैयक्तिक चढाओढींवर , दांभिक वृत्तीवर या कथा प्रकाश टाकतात. मात्र केवळ हेच दाखवण्याचा तर्कदुष्टपणा लेखक करत नाही. हे दोष ठसठशीतपणे दाखवतानाच ते दूर करण्यासाठी झोकून दिलेली, प्रयत्नरत असणारी पात्रेही या कथांमध्ये भेटतात. परिवर्तनाच्या चळवळींविषयी लेखकाला असलेली आस्थाच त्यातून प्रकट होते त्यामुळे हे चित्रण नकारात्मक किंवा केवळ बोटे रोखण्यावर थांबत नाही, तर पर्याय देण्याची जबाबदारीही घेते.