Summary of the Book
मराठीमध्ये रसरसीत आणि प्रत्ययकारी व्यक्तीचित्रणांची परंपरा फार मोठी आहे आणि तितकीच श्रीमंत आहे. माटे, घाटे, अत्रे, खांडेकर, पाध्ये, माडगूळकर, सावंत यांच्यासारख्या पासून ते शरदचंद्र पवारांपर्यंत ती विकसित झाली आहे नि श्रीमंतही झाली आहे. या श्रीमंत परंपरेमध्ये आता पत्रकार सुधाकर कवडे यांचाही समावेश करायला हवा. मातीवर खेळणारी, मातीवर लोळणारी, मातीवर पोसलेली आणि गाव शिवाराशी नाते सांगणारी ही ग्रामीण माणसं म्हणजे मानवी स्वभावाचे बहुरंगी दर्शन होय. या साऱ्या व्यक्तीचे एकच शब्दात वर्णन करावयाचे झाले तर 'प्रेम' एवढा एकच शब्द पुरेसा आहे. कारण त्यांचे स्वतःच्या रंगहीन जीवनावर प्रेम आहे. त्यांचे शेतशिवारावर प्रेम आहे. माणसांवर प्रेम आहे. लोकजीवन आणि लोकपरंपरावर प्रेम आहे. जीवनाला उन्नत करणाऱ्या चिरंतन मूल्यांवर प्रेम आहे. आयुष्यभर सोबतीला असलेल्या दारिद्रयावरही प्रेम आहे. मुख्य म्हणजे दु:ख आणो दारिद्रयावर प्रेम करण्यासाठी मनाची फार मोठी श्रीमंती आवश्यक असते. ही श्रीमंती 'आयपांढरीतल्या' तुकाबाजी, मोहन फिटर, सुरेशनाना, जालिंधर शाहीर आणि इतर पात्रांमध्ये पहावयास मिळते. त्यामुळे त्यांच्या चित्रणाला जीवनदर्शनाचे फार मोठे ऐश्वर्य प्राप्त झालेले आहे यात शंका नाही.
ग्रामीण जीवनातील ही गाळीव रत्ने साकार करताना श्री. सुधाकर कवडे यांच्या लेखणीला हिरव्या पालवीचा रंग आहे. ओल्या मातीचा गंध आहे. फुलत्या फुलाचा सुगंध आहे नि खळखळणाऱ्या पाण्याचा नाद आहे. त्यामुळे खास ग्रामीण बोलीतील ही माणसे आपल्या काळजात केव्हा ठाण मांडतात, हे समजतच नाही.