Summary of the Book
एखाद्या शहराचं मूल्यमापन करायचं झालं तर त्या शहरात किती प्रयोगशाळा आहेत, किती संशोधन केंद्रं आहेत, किती शिक्षणसंस्था आहेत, रुग्णालये किती आहेत, साहित्य-संस्कृती जपणाऱ्या संस्था किती आहेत, मनोरंजनाची कोणती साधने उपलब्ध आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि विविध प्रशासकीय अधिकारी किती कार्यक्षम आहेत हे व असे निकष लावले जातात. म्हणूनच आपल्याकडे निर्मिती परंपरेला, सकारात्मक उभारणीला प्रतिष्ठा आहे. राष्ट्राच्या उभारणीत जे कोणी काही सकारात्मक योगदान देतील तेच आपले खरे आदर्श !
शशिकांत कृष्णाजी कुलकर्णी हे असेच एक प्रामाणिक आणि ध्येयनिष्ठ अधिकारी. कोल्हापूर जिल्ह्यातल्या मेघोली धरण उभारणीचं जबाबदारीचं काम त्यांच्याकडं देण्यात आलं. यासाठी भूसंपादन करताना स्थानिकांचा विरोध होणं अपरिहार्य होतं. अशांना धरणाचं महत्त्व पटवून देणं, त्यातून येणाऱ्या समृद्धीची जाणीव करून देणं, असंख्य अडथळ्यांची शर्यत पूर्ण करत ध्येयमार्गानुयात्रा गाठणं आणि यातूनच इथल्या सहा गावात नंदनवन फुलवणं हे सगळंच काम विलक्षण आहे. आपली नीतिमूल्ये जपत ईप्सित साधनं आणि ते करताना वेळोवेळी माणुसकीचं दर्शन घडविणं,सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्याही नेटानं पार पाडणं यात त्यांचं वेगळेपण दिसून येतं. एखादा अवाढव्य डोंगर फोडणाऱ्या दशरथ मांझीप्रमाणं आपल्या मराठमोळ्या शशिकांत कुलकर्णी यांचं हे कामही महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कन्या मंजिरी कुलकर्णी - एरंडे यांनी अत्यंत प्रभावी आणि ओघवत्या शैलीत या अवलियाची ही धरणगाथा शब्दांकित केल्यानं ती अत्यंत प्रेरक आणि नव्या पिढीसाठी मार्गदर्शक झाली आहे.