महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डीवाय यांचा बालपणीचा काळ, प्रारंभीचा राजकीय संघर्ष, यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील-राजारामबापू पाटील-शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काळ, राजकारणातील तडकाफडकी निवृत्ती आणि नंतर शिक्षण क्षेत्रातील काळ असा सगळा प्रवास या पुस्तकाने उलगडला आहे. ही केवळ डीवाय पाटील यांच्या व्यक्तिगत जीवनाची कहाणी नाही, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक, राजकीय क्षेत्राचा पन्नासहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. जो रोमहर्षक तर आहेच, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघण्याची नवी दृष्टीही देतो.