Summary of the Book
विकास भावे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कवितेला जिवंत ठेवलंय , हे मात्र खरं आहे ! कविता त्यांच्या रक्तात भिनली आहे , असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कवी विकास भावे आणि चित्रकार रामदास खरे हे एकत्रित येऊन हा अनोखा प्रयोग साकारत आहेत आणि अशा अभिनव प्रयोगाला मराठी रसिक आपल्या हृदयात नक्कीच स्थान देतील . कारण अशा प्रकारचे प्रयोग सतत होणे गरजेचे आहे . यातून पुढची पिढी नक्कीच प्रेरणा घेईल , यात खरंच शंका नाही .
या द्वयीची स्वभावरचना लोकांमध्ये मिसळण्याची आहे . निर्मळ मनाची ही दोन्ही माणस वयाच्या एका टप्प्यावर कलेची सतत निर्मिती करताना पाहून माध्यमांच्या चक्रव्यूहात अडकलेला समाज या पुस्तकातून आनंदाचा उत्साह आणि ऊर्जा नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही . रामदास खरे यांची चित्रेही प्रयोगशील आहेत . रंगाचा पोत स्वतःचा असल्यामुळे त्याला मनाच्या कोंदणाचा स्पर्श आहे . चित्रांना ग्रामीण आणि शहरी असा दोहोंचा स्पर्श आहे , तर विकास भावेंची कविता मनाच्या गाभाऱ्यातून अवतरली आहे . असं हे नव्या कोंदणाचं नवं पाऊल एका वेगळ्या मार्गावरचं आहे . नव्या वाटा निर्माण करणार आहे .