Summary of the Book
या कादंबरीतील गोष्ट नेमकी कोणाची आहे? एका भांडी विक्याने घेतलेल्या एका लेखकाच्या शोधाची की भांड्यांवर नाव घालणा-या लेखाकाची? लेखकाने लिहिलेल्या सिनेमाच्या पटकथेची की त्या पटकथेत न मावणा-या शेतक-याची? जोतीराव फुल्यांच्या स्वप्नभंगाची की दिवसेंदिवस स्वार्थी- आत्मकेंद्री विखंडीत होत चाललेल्या समकालीन समाजाची? कि या सगळ्यांचीच? सांगणं कठीण आहे. पण हि केवळ गोष्ट नाही एवढं निश्चित.
या कादंबरीला अनेक आरंभ आहेत पण शेवट नाही. 'कथांतर्गत कथा' अशी रचना असलेल्या या कादंबरीत डाय-या आहेत, पत्र आहेत, पटकथाही आहे. कादंबरीतले दिपूशेठ, कोणकेरी , आडव्याप्पा हि सगळीच पात्रं आपापल्या भोवतालचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. झपाट्याने नगर होत चाललेल्या ग्रामीण- बहुजन समजाविषयीचा, त्यातल्या व्यक्ती आणि कुटुंबाविषयीचा हा गुंता आहे. नागरीकरणाच्या वामानी पावलाने समाजाच्या तळाशी गाडल्या गेलेल्या शेतक-याच्या जीवनाविषयीचा हा गुंता आहे. वाजत गाजत सुरू असलेल्या नागरीकरणाची नेमकी दिशा कोणती? ती आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे? या नागरीकरणाची मूल्यव्यवस्था कोणती? त्यातून कोणाचं हित जपलं जात आहे? अशा कळीच्या प्रश्नांचा गुंताळा आहे.
ही कादंबरी वाचणं म्हणजे प्रश्नांच्या या गुंताळ्यात गुरफटत जाणं. वाचकाची त्यातून सुटका नाही आणि कादंबरीला शेवट नाही. राजन गवस यांच्या लेखकीय कारकीर्दीने 'ब बळीचा या कादंबरीच्या रूपाने एक नवं वळण घेतलं आहे, निश्चित.