जगात 'खूप लोक आहेत' आणि त्यातले अनेक त्यांच्या त्यांच्या परीने सत्य शोधू पाहतायत. या कादंबरीत सुद्धा अनेक पात्रे धर्म, अध्यात्म, कामवासना, वास्तव, फिक्शन - या साऱ्याचा संशोधनात्मक ठाव लावू पाहतायत, यात सर्वात अग्रेसर कादंबरीचा लेखक. कादंबरीचा सुरुवातीचा भाग मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीने उलगडत जातो, पात्रे येत राहतात, घटना घडू लागतात पण एका ठोस पूर्णत्वाकडे हा प्रवास चाललाय असं वाटत नाही (अर्थात असं वाटू नयेच). शेवटाच्या जवळ येता येता ही कादंबरी कादंबरी राहत नाही, ती खूप वेगळं काहीतरी होते! कथानकात सुरुवात-मध्य-शेवट आणि तर्काची जुळवाजुळव या अश्या अनेक मर्यादा ती पाळत नाही, किंबहुना ती कथानकाच्याच मर्यादेत राहत नाही.
मनोहर एकंदरीत नातेसंबंधांकडे एका विलक्षण फार्सीकल चष्म्यातून पाहतात. नात्यांमधली ठिसूळता, त्यात असलेली अर्थहीन गुंतागुंत त्यांना गमतीची वाटते, अर्थात खोचटपणे. मनोहर पात्रांच्या डोक्यात त्यांच्या सोयीपुरतेच जातात. त्यांच्या व्यक्तित्वातला, अनुभवविश्वातला लेखकाच्या सोयी पुरता भाग आपण पाहतो. पुस्तकं वाचून सकारात्मक उर्जा, इतर छान छान जीवनावश्यक मुल्ये आत्मसात करणाऱ्यांची तर अनेक वेळा तारांबळ उडेल.