Summary of the Book
रघुवीर सामंतांनी अध्यापन, लेखन, संपादन, प्रकाशन, चित्रपटनिर्मिती, कोशनिर्मिती, लॉजिंग-बोर्डींग असे अनेक व्यवसाय केले. मनात आलेली प्रत्येक योजना कृतीत आणण्यासाठी धडपड करीत राहणे हा त्यांचा स्वभाव-धर्म होता. परंतु कोणतीही गोष्ट सातत्याने करण्याकडे त्यांचा कल नव्हता. सातत्याने काही करण्याचा प्रयत्न त्यांनी केला तरी त्यांच्या वाट्याला अपयशच येत गेले. साहित्यनिर्मिती, अध्यायन, संपादन या क्षेत्रांत त्यांनी विशिष्ट काळात आपला ठसा उमटवला, आपल्या कतृत्वाने इतरांना आकर्षित करून घेतले; तथापि अल्पावधीतच पारिजातकाचे सुंदर, नाजूक फूल कोमेजून जाते; तसे विविध क्षेत्रांतले सामंताचे कार्य संपुष्टात आले. अल्पकाळच त्यांच्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटला. त्यांच्या आयुष्यातील बेरीज-वजाबाकीचा खेळ सतत सुरू राहिला. आज `कुमार रघुवीर’ हे नाव विस्मृतीत गेले असले तरी त्यांच्या वाङ्मयीन कतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करता येते.
रघुवीर सामंतांचा लेखनाच्या प्रारंभीच्या काळातील शब्दचित्रे, स्वभावचित्रे व चित्रबंध हा वैशिष्टयपूर्ण स्फुटलेखनाचा यशस्वी प्रवास, `उपकारी माणसें’¸`भेटेन पुन्हा!’ सारख्या प्रदीर्घ व समर्थ कादंबर्याचे लेखन, `पारिजात’ मासिकाद्वारे तत्कालीन वाङ्मयीन संस्कृतीत घातलेली मौलिक भर, बालमित्रांविषयी वाटणार्या जिव्हाळ्यातून निर्माण केलेले बालवाङ्मय, `ज्ञानपारिजात’ या विज्ञानकोशाच्या दोन आकर्षक खंडांची परिश्रमपूर्वक केलेली सिद्धता हे रघुवीर सामंतांचे मराठी साहित्यविश्र्वातील कार्य निश्चितच लक्षणीय आहे!