Summary of the Book
पॅराप्लेजियानं कायमच्या अपंग झालेल्या सोनाली नवांगुळ या तरुणीचा या कवितासंग्रहाबद्दलचा हा बोलका अभिप्राय-
’ ’नेमानं पाय टाकले मोरासारखे, की जगण्याला कशी ऐट येते पोरा’ - या ओळींवरून पुस्तक उघडताचक्षणी नजर फिरली आणि मनाच्या नितळ काचेवर जमलेली निराशेची वाफ जादूसारखी नाहीशी झाली. त्या कवितेनं माझ्याशी हितगूज केलं. थोडी दटावणी, थोडी माया, थोडं चुचकारणं यातून सैरभैर मन ताळ्यावर आलं. खरंच तुमची कविता फार चांगली आहे!
या कविता एकापाठी एक अशा झटझट वाचता आल्या नाहीत, कारण प्रत्येक नव्या अनुभवाला त्यांच्यामार्फत भिडताना थांबावंच लागलं. हट्टी, बेजबाबदार, निर्ढावलेल्या मनाला या कविता चिंतनासाठी प्रवृत्त करून माणूसपणाचं भान आणतात. तुम्ही न भेटता तुमची कविता आमच्यासाठी हे असं करते, ही खूप मोठी गोष्ट आहे.
तेव्हा मनोजदादा- लिहीत रहा... बळ देत रहा.... ते हवंय... खूप हवंय...’