Summary of the Book
नारायण जगताप या नव्या लेखकाचं हे आत्मनिवेदन. तपशीलवार लिहिलेलं किंवा नेमक्या घटनांचं एक विस्तृत आत्मकथन असं म्हटलं तरी चालेल. फार वर्षांपूर्वी माझ्या वाचनात एक महत्त्वाची पुस्तिका आली होती. तिचं नाव होतं `कोण कसा चरितार्थ चालवितो’. नेमकं हे आत्मनिवेदन वाचताना त्या पुस्तिकेची मला आठवण झाली आणि चटकन वाटलं, `खरंच, स्वतःला कोण कसा घडवितो’. `हेड्या’ त्यापैकीच एक.
शेकडो जाती आणि उपजातीवर आधारलेला, चातुर्वर्ण्यावर उभा असलेला आपला भारतीय समाज. त्यातील हेड्या हा जमातवाचक आणि उपहासगर्भ असा अर्थ प्राप्त झालेला शब्द. कित्येकांना अपरिचित असण्याचीच शक्यता जास्त. समाजाच्या सर्व थरांतील लोक जेव्हा बोलू, लिहू लागतात तेव्हा तेही स्वबोलीतील शब्दांना जिवंत करत त्यांना वेगळे परिमाण देतात. `हेड्या’ हा त्यातीलच एक शब्द. हे सर्व आत्मवृत्त मोठ्या समंजसपणानं व संयमीवृत्तीनं लिहिलेलं आहे. कुठेही त्रागा नाही, इतरांना बोल लावलेला नाही किंवा आक्रोश व्यक्त करणारंही नाही. जे जगणं लाभलं ते स्वीकाररून, स्वतःकडे व भोवतालच्या सामाजिक स्थितीकडे डोळसवृत्तीनं बघत स्वतःला घडवीत जाणारं आहे. एक सामाजिक शहाणपण ज्याला म्हणतात ते या आत्मनिवेदनाला लाभलेलं आहे. सर्व समाजगटातील थोर व्यक्ती, सहकारी मित्र, घडणार्या दाहक घडामोडी, त्यातून येणारे विविध अनुभव, शैक्षणिक भान व सर्व थोर विचारवंतांच्या स्वागतशील विचारांचा स्वीकार, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व या सर्वांविषयीची निरलसपणे समजून घेण्याची विवेकशील वृत्ती हे या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
नारायण जगताप लेखनाच्या तपशीलात खूपच गुंतलेले वाटले. परंतु मला वाटते, नव्यानेच लिहिणारा लेखक काय लिहू व किती लिहू असे त्याचे होते. थोडासा आवर हवा होता. असो.
नारायण सुर्वे