Deepali Deshpande
16/12/2018
मराठीमध्ये एकतर कार्पोरेट विषयांवरच्या फारशा कादंबर्या नाही आहेत. त्यामुळे विषयाचे वेगळेपण हे कादंबरीचे मोठे आकर्षण आहे. सामान्य व्यक्तिपासून एका बहुराष्ट्रीय कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा डॉ. अजय शिरोडकरचा प्रवास म्हणजे ही कादंबरी. यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा प्रवास आपापल्या वाटेने सुरू आहे. कथेत फार गुंतागुंत होत नाही. नायकाचे सहकारी आणि बॉस यांचे चित्रण हे कमालीचे वास्तववादी आहे. त्यामुळेच ही कथा केवळ एका अजय शिरोडकरची न राहता कार्पोरेट क्षेत्रात काम कारणार्या प्रत्येकाची होऊन जाते. यशाचे सोपान चढताना कशा अवस्थांमधून जावे लागते याचे वास्तवदर्शी वर्णन करणारी ही एक वेगळी कादंबरी आहे. ती कुठेही विषयाच्या बाहेर जात नाही, भटकत नाही, तसेच कुठे थांबतही नाही. तसेच भाषेतील साधेपणाची लय कुठेही सुटत नाही. पण या कादंबरीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची गोष्ट सांगण्याची शैली. एखाद्या इंग्रजी चित्रपटात शोभावे इतके थेट वर्णन लेखकाने केले आहे. आणि तेही कमालीच्या अलिप्तपणे. हा अलिप्तपणा वाचकाला सतत अस्वस्थ ठेवतो पण तरी खिळवूनठेवतो. टिपिकल कादंबरीपेक्षा ही कादंबरी वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आणि म्हणूनच वाचनीय आहे.
Sachin jagdale
19/10/2018
‘लॅडर वरच्या संवेदना’ ही डॉ.गिरीश वालावलकर लिखित कादंबरी नुकतीच वाचनात आली. ही कादंबरी वाचताना ज्याला संवेदना नाहीत त्याच्या संवेदना जागृत होतात आणि जो संवेदनशील आहे त्याच्या संवेदना आणखी तीव्र होतात. अजय हा या कादंबरीचा नायक आहे. सांगली सारख्या छोट्या नगरातून आलेला अजय पुढे जाऊन कॉर्पोरेट जगतात कसं नाव कमावतो त्याची कथा... खरतर कथेऐवजी मी प्रवास हा शब्द वापरेन, त्याचं गुंतवून टाकणारं आणि विचार करायला लावणारं वर्णन या कादंबरीत आलंय. गुंतवून टाकणारं यासाठी की कॉर्पोरेट जगताशी संबंधित ही कादंबरी असली तरी त्याला अनेक कौटुंबिक आणि सामाजिक छटाही आहेत. विचार करायला लावणारं म्हणण्या मागचा उद्देश हा की कॉर्पोरेट जगताशी संबंध नसलेला व्यक्ति तिथल्या खाचा खोचा वाचून विचारात पडल्याशिवाय राहत नाही. या कादंबरीत अवास्तव असं काहीच नाही. मी स्वतः एक दशकाहून अधिक काळ कॉर्पोरेट पत्रकारिता केलीय त्यामुळे या कादंबरीत वर्णिलेल्या कॉर्पोरेट वातावरणाबद्दल, तिथे घडणार्या गोष्टींबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकतो. मराठी भाषेत कॉर्पोरेट क्षेत्र हा गाभा ठेऊन, आत्तापर्यंत केलं गेलेलं हे सगळ्यात वास्तववादी आणि प्रभावी लिखाण आहे असं म्हणताना