Summary of the Book
कवी यशवंतांनी महाकाव्याला मराठी इतिहासाने दिलेला हा विषय घेऊन मराठी साहित्याची अमर सेवा केली आहे. शिवरायांचे जीवन घडत असताना त्यांच्या समकालीन दोन प्रतिभावान पुरुषांना त्यांच्या जीवनाचा अर्थ समजला. एक उत्तर भारतातील इतिहासप्रसिद्ध कवी भूषण व दुसरे समर्थ रामदास. उत्तर भारतात बुंदेलखंड, हरियाना, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात कवी भूषणची ललितवाणी असंख्यांच्या कंठातून ऐकली गेली तशीच समर्थांची संतवाणी तेव्हाच्या महाराष्ट्राला आवर्जून सांगत होती की, शिवरायाचे रूप आठवा, शिवरायाचा प्रताप आठवा, शिवरायाचा साक्षेप आठवा आणि त्याच्या जयघोषाने भूमंडल भरून टाका. शिवरायांचे जीवन एवढे भव्य आहे की, त्याचे गीत भूषण, समर्थांच्या नंतर अनेक कवींनी गायले. यात रविंद्रनाथांची ओजस्वी प्रतिभाही सामील झाली आहे.