Summary of the Book
मानवाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या कळत अथवा नकळत होणार्या प्रदूषणामुळे ते संतुलन आणि पर्यायाने आपले स्वास्थ्य बिघडत असते. ह्या प्रदूषण प्रक्रियेचा शास्त्रोक्त विचार आणि त्यावरील उपायांची वैज्ञानिक चर्चा ह्या पुस्तकात उत्तम तर्हेने केली आहे. पर्यावरण संतुलन साधण्यासाठी वन आणि वन्य प्राणी ह्यांच्या संरक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून त्यासाठी केलेले विविध उपाय व निरनिराळ्या जमातींतील कायदे ह्यांची खि. पू. 1500 पासूनची क्रमश: माहिती सुरुवातीच्याच प्रकरणात दिलेली आहे.
आपल्या औद्योगिक विकासाच्या बरोबर वातावरणातील कर्बाम्ल वायूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगून त्यामुळे येणार्या संभाव्य आपत्तीचे वर्णन एका प्रकरणात केले आहे. त्यावरील उपायांची चर्चा देखिल केली असल्याने पर्यावरण संतुलन साधता येऊ शकत असल्याचे समजून मनाला दिलासा देण्यात लेखक यशस्वी झाला आहे. अनेक तणनाशकातून वाढणारे विषारी द्रव्ये 'डायॉक्झिन’ची माहिती व त्यापासून होणारे गंभीर परिणाम 2-3 प्रकरणांतून दिले आहेत.
आम्ल पर्जन्याची शास्त्रीय माहिती व त्याच्या परिणामाचे वर्णन मोजक्या शब्दात पण प्रभावीपणे केले आहे. ओझोनच्या थराविषयी माहिती व त्याची उपयुक्तता दाखवून काही रासायनिक वायूंमुळे हा थर कसा नाहीसा होण्याची शक्यता असल्याचे वर्णन केले आहे. ह्या थराला नुकतेच छिद्र पउल्याने घडणार्या परिणामांचे वर्णन केले असून, हानी टाळण्यासाठी केल्या जाऊ शकणार्या उपायांची विस्तृत चर्चा केली आहे. चेर्नोबिल येथील अणुभट्टीच्या स्फोटाची माहिती व त्याच्या परिणामांचे वर्णन करून ह्या अपघातापासून मिळणार्या संदेशाचे चिंतन लेखकाने अत्यंत कुशलपणे केल्याचे दिसते.
पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात लोकसंख्यावाढीमुळे औद्योगिक क्षेत्रातील वाढ अपरिहार्य झाल्याने पर्यावरणातील प्रदूषणाच्या धोक्याचे वर्णन केले आहे. परंतु हे प्रदूषण आता वैज्ञानिक प्रगतीमुळेच कसे रोखले जाणे शक्य आहे, याचे देखील ह्याच प्रकरणात सविस्तर वर्णन करून शेवटी विज्ञानच आपल्याला तारक ठरणार असल्याचे आशादायी चित्रण करण्यात लेखक नक्कीच यशस्वी झाला आहे. एकंदरीत हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे.