Summary of the Book
ज्ञानेश्वर महाराजांनी शके १२१२ म्हणजे इ.स. १२९० यावर्षी ज्ञानेश्वरीचे लेखन पूर्ण केले. ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वैद्य १३ शके १२१८ म्हणजेच इ.स. १२९६ या दिवशी समाधी घेतली. ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर समाधी घेण्यापर्यंतच्या काळात म्हणजे शके १२१२ ते शके १२१८ या दरम्यान त्यांनी ‘ अमृतानुभव’ हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीत स्वतंत्र विवरण पुष्कळ असले तरी तो ग्रंथ गीतेवरील भाष्य आहे; पण अमृतानुभव हा ग्रंथ त्यांच्या प्रज्ञेचा अगदी स्वतंत्र असा उत्कर्ष आहे. अमृतानुभव दहा प्रकाराने असून आठशे सहा ओव्या आहेत.
‘आकाराने लहान पण गुणांनी अत्यंत महान’ असा हा ग्रंथ ज्ञानदेवांच्या कुशाग्र बुद्धीचा विलास दाखवतो. ‘बोली अरूपाचे रूप दावीन’ ही प्रतिज्ञा अमृतानुभवात खरी झाली आहे. अमृतानुभावाच्या पहिल्याच प्रकरणात प्रकृतीपुरुषाचे ऐक्य वर्णन केले आहे. या पायावरच पुढील सर्व ग्रंथाची उभारणी झाली आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी वाड्मयाचा हिमालय पर्वत समाजाला तर अमृतानुभव हे त्या हिमालयातील सर्वात उंच शिखर आहे. सर्व तीर्थयात्रा संपवून परत आल्यावर ज्ञानदेवांनी हा ग्रंथ लिहिला. अमृतानुभवाचे श्रवण केलेल्या लोकांनी ज्ञानदेवांना ‘अकरावा’ अवतार मानले यात नवल नाही. अमृतानुभावाच्या रचनेमुळे ज्ञानदेव सिद्धपुरुष आहेत, अशी सर्वांची खातरजमा झाली. या ग्रंथाचा अभ्यास केल्यास तुमच्या अंत:करणात प्रकाशाची ज्योत उत्पन्न होऊन कायम तेवत राहील.
ज्ञानेश्वर महाराजांची चांगदेवपासष्ठी म्हणजे चांगदेवास उद्देशून लिहिलेल्या पासष्ठ ओव्या आहेत. पण या सर्वच साधक मुमुक्षांना तत्वबोध करून देणाऱ्या आहेत. चांगदेवपासष्ठीतील पासष्ठ ओव्या म्हणजे भागवत धर्माची पासष्ठ सूत्रेच आहेत. ही सूत्रे अर्थगर्भीत असल्यामुळे त्यातील तत्वांचे स्पष्टीकरण करण्यासाठीच ज्ञानदेवांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली असावी, असा एक तर्क आहे.
चांगदेवपासष्ठीमध्ये ज्ञानदेवांचे सर्व तत्वज्ञान सूत्ररूपाने आले आहे. या तत्वज्ञानाचे विवरण अमृतानुभवात केलेले असल्यामुळे ज्ञानदेवांचे हे दोन्ही ग्रंथ या पुस्तकात एकत्र दिले आहेत.