Summary of the Book
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा करोल बागेतले प्रतिष्ठित व्यापारी म्हणून स्वत:ला सिद्ध करेपर्यंतचा आणि त्यानंतरचा त्यांच्या कुटुंबाचा प्रवास. काळानुसार केलेले, करावे लागलेले बदल. एकत्र कुटुंबपद्धती, एकत्र व्यवसाय दोन्हींचा समतोल राखणं, पिढ्या-पिढ्यांच्या विचारांतलं अंतर, घरातल्या माणसा-माणसांचे बदलते विचार, वाढत राहणारे नातेसंबंध, वेगवेगळे स्वभाव या सगळ्याचं मनोज्ञ दर्शन "फॅमिली' वाचताना घडत राहतं. आई-वडील, पती-पत्नी, बहिणी-बहिणी, सासू-सुना, दीर-जावा, मुलं-मुली, व्याही-विहिणी अशा कुटंबातल्या सगळ्या नातेसंबंधांचं अचूक वर्णन वास्तवदर्शी, ओघवत्या बोलीभाषेतून वाचताना, प्रसंग सजीव होऊन नजरेसमोर उभे राहतात.
दैनंदिन जीवनात येणारे छोटे-मोठे विजयाचे, पराभवाचे, आनंदाचे, काळजीचे प्रसंग. एकत्र कुटुंबामुळे वाढणारं बळ आणि येणारे ताण. सत्तासंघर्ष, निरपेक्ष आणि सापेक्ष माया-ममता, परंपरा पाळण्याचे आणि संस्कृती राखण्याचे पर्यंत हे सारं आपल्यासमोर घडल्यासारखं वाटतं आणि पाश्र्वभूमीवर जाणवत राहतो स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीचा, बदलत्या व्यावसायिक, धार्मिक आणि नौतिक कल्पनांचा धावता आलेख. "फॅमिली'मधली माणसं आपल्यातली, ओळखीची वाटतात. तिथेच राहून आपल्याशी गप्पा मारल्यासारखी लेखिका हकिगत सांगत जाते आणि आपण त्यात गुंतून राहतो.