Summary of the Book
‘घटकापळाने’ या कवितासंग्रहातील कवितेचा नायक एकविसाव्या शतकामध्ये आपले स्वत्व शोधणारा माणूस आहे. जागतिकीकरणामुळे संस्कृतीचे होणारे सपाटीकरण व माध्यमांनी समाजाच्या केलेल्या फसवणुकीचा उल्लेखही या कवितासंग्रहामधील कवितेत आहे.तसेच या कवितासंग्रहातील कविता काळ व रेणू यांची जाणीव ठेवून कवीने लिहिल्या आहेत.
जन्म व मृत्युविषयक चिंतनं, स्त्री-पुरुष संबंधांतील प्रेम व मैथुनविषयक जाणिवा, ईश्वर विशेषत: आदिम शक्तितत्त्वाविषयी भारतीय मनाला वाटणारं गूढ, स्त्रीविषयी पुरुषी दृष्टिकोनातून केलेलं चिंतन, निर्मितीप्रक्रियेचा शोध, दु:ख-जाणिवांचा वेध, अशा अनेक आशयसूत्रांच्या अनुषंगानं शेणई यांची कविता पाहावी लागते. मात्र, एकूणच मानवी आयुष्याशी संबंधित असलेल्या या वैश्विक जाणिवांकडे पारंपरिक मराठी कवितेतल्याप्रमाणे सनातनी दृष्टिकोनातून न पाहता कालसापेक्ष बदलत्या मूल्यांच्या संदर्भात त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेल्यामुळे या कवितांना आधुनिक परिमाण प्राप्त झालेलं दिसतं.
पारंपरिक आशयसूत्रांचा आधुनिक काळाच्या संदर्भात नवा अन्वयार्थ लावण्याचा असा प्रयत्न समकालीन कवितेत क्वचितच होताना दिसतो आहे. भारतीय परंपरेतील चिरंतन मानवी मूल्य-जाणिवांचा शोध घेणा-या या कवितेत वर्तमान वास्तव जगण्याचे संदर्भही त्यामुळेच जागोजाग भेटत राहतात. मात्र, तरीही भावगर्भ चिंतनशीलतेमुळे या कविता वर्तमानपत्री होण्यापासून सहजपणे टळतात. उदाहरणार्थ, मोबाइलवर बोलणारी आजच्या युगातली कवितेतली मुलगी किती सहजपणे पुरुषी वृत्तीवर भाबडेपणाने विश्वास टाकणा-या समस्त स्त्रीजातीच्या आदिम वेदनेशी जोडली जाते हे पाहता येईल.
शिरोड्याचे वेळागर, दहशतीचे बूट, वृत्तपत्र, आठ स्तंभ, वृत्तपत्राची दहशत, खरखर, संपादकांस पत्र, मुंबई यांसारख्या वर्तमान वास्तवातील तपशिलांवर विसंबणा-या काही कविता त्यातील चिंतनशीलतेच्या भाववाही स्वरूपामुळेच निव्वळ आजच्या जगणच्या कविता न होता सार्वकालीन मानवी जगण्याच्या कविता बनल्या आहेत. कवितेच्या अस्सल परंपरेची व रूपाची अचूक जाण आणि कालभान राखून त्यांची आधुनिक जाणिवांची घातली गेलेली सांगड यामुळेच शेणई यांच्या कवितांना हे सार्वकालीन किंवा वैश्विक स्वरूप प्राप्त झालं आहे.