Summary of the Book
जमिनीत मुळे रुतवून आकाशात हिरवा विस्तार पसरणाऱ्या झाडांचे सांगाडे समोर उभे ठाकावेत ; आपल्या भोवतीच्या वास्तवात एवढा बदल व्हावा की नव्या अपरिचित वास्तवामुळे आपणच आपल्या स्वतःलाच अनोळखी होऊन जावे ; आपल्याला सवयीच्या झालेल्या रहिवासातून हुसकावून काढले जावे आणि आंधळलेल्या डोळ्यांनी , पायांनी नव्या रहिवासाच्या शोधात दिशाभ्रम झाल्याप्रमाणे इतस्ततः भटकत राहावे ..
विनायक येवले यांच्या ठसे बदललेल्या मुक्कामावरून या संग्रहातील कविता वाचत असताना मला असा प्रत्यय येत गेला . हा संक्रमणाचा काळ आहे , आणि स्थलांतर ही त्याची अपरिहार्य निष्पत्ती आहे . विसाव्या - एकविसाव्या शतकातील मानवजातीच्या वाट्याला आलेले हे स्थलांतर आहे . हे स्थलांतर केवळ एका भूमीवरून बेदखल होऊन दुसऱ्या भूमीवर राहुटी उभारणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही . तितके ते सहजसोपेही नाही .
हे शारीरिक , मानसिक , आत्मिक स्थलांतर आहे . भूत , वर्तमान , भविष्य असे सगळे काळ छाटून टाकणारे हे स्थलांतर आहे हे होत असतानाच्या वेदना या संग्रहातील कवितांमधून व्यक्त झालेल्या आहेत.
या संग्रहातील 'हरवलेल्या गावास अनावृत्त पत्र' यासारख्या कवितेत एखादे खेडे कसे बदलत गेले किंवा आजच्या ग्रामीण जीवनात कसा पालट होत गेला , याचे चित्रण आढळते . इतक्या मर्यादित दृष्टीने या कवितेकडे पाहता येत नाही , तर सबंध समाजच , विपरीत अर्थाने , कसा बदलत गेला याचे त्रस्त करणारे चित्रण येथे आहे , हे आपल्याला जाणवते . माणसाच्या रहिवासातील अभिन्न अशा गोष्टीच क्षा हळूहळू नष्ट होत गेल्या आहेत आणि त्यामुळे तो आणि राहिवास यात अंतराय निर्माण झाला आहे , याची तीव्र जाणीव येथे आहे . त्यामुळेच या संग्रहात घनघोर आक्रोशाने सुन्न पडलेले नकाशे , गुदमरून गपगार झालेले सोशीक हुंदके , आसऱ्यासाठी धडपडणारे मरणपिंजरी सापळे , हाडांना उगाळत जगण्याला कवटाळणाऱ्या मुक्या बाया अशा प्रतिमा येतात , त्या अत्यंत समर्पक अशा आहेत .