Summary of the Book
‘चाकरमानी’ म्हणजे खेडेगावातला माणूस शहरात येऊन मानाची चाकरी करणारा... गावच्या लोकांच्या दृष्टीनं तो चाकरमानी.
या नाटकाचा नायक चाकरमानी मालवणमधल्याच खेडेगावात आढळतो, असं नाही. भारतातील कुठल्याही खेडेगावात, इतकंच काय, जगाच्या पाठीवर- जिथं खेडेगावातली माणसं पोटापाण्याच्या उद्योगासाठी शहराकडे धाव घेताहेत, तिथं, नोकरी धरून, विश्रांतीसाठी सुटी घेऊन, आपल्या गावी येताहेत, तिथं तिथं तुम्हांला हा ‘चाकरमानी’ सापडेल. कमी-अधिक फरकात... पण सापडेल. त्याचा चेहरा वेगळा असेल, पेहराव वेगळा असेल, भाषा वेगळी असेल... पण वृत्ती हीच !
या नाटकाचं कथानक घडतं मालवणच्या परिसरातल्या एका खेडेगावात. याच परिसरात मी जन्माला आलो. मालवणी भाषा बोलता बोलता मोठा झालो. तिथल्या माणसांत वावरलो. त्यांचे गुणदोष, सवयी, स्वभाव, सुखदु:खं मी अगदी जवळून निरखली. माझ्या नाटकाचा नायक चाकरमानी त्याला मी अनेक रूपांत तिथंच पाहत आलो आहे.
माझ्या नाटकाचा हा नायक मला जेव्हा ‘दिसला’, तेव्हा त्या मातीतील अनेक माणसं त्याच्या आजुबाजूला होती. त्या माणसांचे स्वभाव, त्यांच्यांतील बेदरकारपणा, लोचटपणा, रिकामटेकडेपणा, आळस, अंधविश्वास आणि सच्चेपणा ही या चाकरमान्याच्या अस्तित्वाला फुलवतील, त्याच्या स्वभावातली वैशिष्ट्यं ठळक बनवतील आणि त्यातून त्याची शोकान्तिका निर्माण करतील, याची मला खात्री पटली आणि या नाटकाचं कथानक जन्माला आलं...