Summary of the Book
रत्नाकर मतकरी यांचे पहिले प्रकाशित बालनाटक `मधुमंजिरी’ 1959 चे. आज, 2001 संपताना-42 वर्षांनंतरही, त्यांच्या पहिल्या नाटकाइतकेच टवटवीत, खेळकर, रंगतदार असे हे नाटक-`चमत्कार झालाच पाहिजे!’
दरम्यानच्या काळात मतकरींनी, प्रौढांसाठी लिहीत असतानाच, सुमारे दोन डझन बालनाटके लिहिली. आपली पत्नी प्रतिभा हिच्या साहाय्याने `बालनाट्य’ ही संस्था (1962) काढून, वाढवून, त्यांनी त्यापैकी सतरा-अठरा नाटके रंगभूमीवर आणली, चालवली. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे काहींचे पुनःपुन्हा पुनरुज्जीवन केले.
मुलांना सामाजिक प्रश्र्नांविषयी जागरूक करण्यासाठी `चाय खोका रंगमंच’ काढून गल्ल्यागल्ल्यात, वस्त्यावस्त्यात, सुधारगृहात आणि इस्पितळातही बालनाट्य पोहोचवले. पण `बालनाट्या’ने मुख्यतः शाळाशाळांमधून आणि नाट्यगृहांमधून प्रयोग केले.
यापैकी बहुतेक नाटकांचे दिग्दर्शन मतकरींनी स्वतः केले. काहींमध्ये भूमिकाही केल्या. ही सर्व नाटके अतोनात बालप्रिय ठरली. त्यांपैकी काहींची हिंदीत व गुजरातीमध्ये भाषांतरेही झाली.
ललितकलासाधना, इंडियन नॅशनल थिएटर, गोवा हिंदू असोशिएशन व `कळसूत्री’ या संस्थांनी मतकरींच्या काही बालनाटकांची निर्मिती केली.
`चमत्कार झालाच पाहिजे!’ हे त्यांचे अगदी अलीकडचे नाटक. जाचक वास्तव आणि मुलांचे मनोबल यांच्यातील संघर्षाची ही कहाणी. अनेक नाट्यपूर्ण प्रसंगांनी आणि चमत्कारांनी भरलेली, गाणी, नाच, विनोद यामुळे विलक्षण रंजक झालेली.
यांतील गंमत मुलांसाठी आहे, संदेश पालकांसाठी.
बालक-पालक या दोघांनीही पाहिले पाहिजे, निदान वाचले तरी पाहिजेच, असे हे अद्भुत नाटक-`चमत्कार झालाच पाहिजे!’