Summary of the Book
स्त्री ! मग ती नागर असो किंवा ग्रामीण. ती षोडशा असो किंवा प्रौढ वयाची. समाजानं, कुटुंबपद्धतीनं तिला एक भळभळती वेदना बहाल केलेली असते, तिचं सारं भावविश्व, जीवन या वेदनेनं ढवळून निघतं. सार्या जीवनाला वेढलेली ही वेदना या कथांमधून वाचकांच्या मनात झिरपत जाते. या दर्शनानं मन अंतर्मुख होतं.
या सर्वजणी लेखिकेला आयुष्याच्या वळणांवर कुठे ना कुठे भेटल्या. त्यांच्या वेदना, दु:ख, आशा आकांक्षा त्यांनी लेखिकेजवळ उघड्या केल्या. त्या वेदनांचीच ही कथापुष्पे.
या प्रत्येक कथेतून स्त्री जीवनाच्या विविध पातळीवरील अगतिकतेच, अटळ वास्तवाचं भेदक दर्शन घडतं. बिनदरवाज्याच्या घरकुलामधील तुळसा, कैकयी हा छाप बसताच सैरभैर झालेली रजनी, जीवनाला पाठमोरी झालेली वसू अशा अनेक स्त्रीया. या चिरकालीन वेदना घेऊन स्त्री अजून किती वर्षे वणवण फिरणार आहे ? या प्रश्नांनं मन उदास होतं. तरीही या कथा मनाची पकड घेतात. मनात ठाण मांडून बसतात. हेच या पुस्तकाचं अंगभूत सामर्थ्य.