Summary of the Book
बेचाळीसच्या क्रांतीने प्रफुल्लदत्तांच्या प्रतिमेला विशेष गती मिळाली. तत्पूर्वी दोन वर्षे त्यांनी स्वयंप्रेरणेने अध्यापकाचा पेशा स्वीकारला होता. वाचनाचा व्यासंग आणि कवितेचा छंद यांनी त्यांच्या अध्यापनात रंग भरला. कवितेबरोबरच त्यांनी गद्य-लेखनही चालू ठेवले. एक नामवंत शिक्षक म्हणून त्यांचा बाहेरच्या जगात बोलबाला होऊ लागला. अजूनपर्यंत ‘कैरविणी’ ‘शिवस्वप्न’ आणि ‘प्रपंचगीते’ या काव्यसंग्रहांव्यतिरिक्त त्यांनी ‘तपोवनातील दूर्वा’, ‘डोळ्यांची निरांजने’, ‘बोधिवृक्षाच्या छायेत’, ‘बिल्वदले’, ‘भावलेणी’, ‘आळसावलेले क्षण’, ‘मुक्ता आणि मीना’, ‘पदचिन्हे’, इत्यादी शैक्षणिक आणि ‘सांस्कृतिक’ पुस्तके लिहिली.
‘रुबाया’ हा काव्यप्रकार तर त्यांच्या चिंतनशील प्रवृत्तीचा श्वासोच्छ्वास म्हणता येईल. त्याची प्रचीती ‘लाटा-लहरी’, ‘चिंतनिकेची पाने’ आणि ‘निळावंतीचे नृत्य’ या संग्रहांवरून येईल.
‘अमृतसिद्धी’ हा त्यांचा सत्तरीचा शिलेवर ध्यानस्थ झालेल्या वयाचा शैक्षणिक आविष्कार आहे. त्याची पार्श्वभूमी आहे सांस्कृतिक आणि वृत्ती जातिवंत कवीची. कसदार जमिनीतून वर आलेल्या मांडवावर चढणाऱ्या टपोऱ्या द्राक्षाच्या वेली जशा रसभराने ओथंबून खाली येतात, तसे ‘अमृतसिद्धी’चे एकेक छोटेमोठे प्रकरण आहे.