Summary of the Book
एक गोष्ट सांगणार्या साध्या रचनेला, गहन जीवनाशयाचे परिमाण कसे प्राप्त होते याचा प्रत्यय, विजया राजाध्यक्ष यांच्या या कथासंग्रहात विशेषत्वाने येतो. या कथेच्या केंद्रस्थानी, वेगवेगळ्या पिढ्यांतील ‘स्त्री’ आहे. तिचे घर, परिसर, कार्यक्षेत्र, नातीगोती व ताणतणाव यांचे कथन आहे. या चित्रणाला, बदलत्या कौटुंबिक व सामाजिक वातावरणाचा संदर्भ असला तरी, ‘स्त्री’च्या आंतरिक जगण्याला असलेले प्राधान्य हे त्याचे वैशिष्ट्य आहे. विकल करणार्या एकटेपणाला सामोरे जात, स्वतःच्याच सोबतीतील गाढ तृप्ती अनुभवणार्या समर्थ ‘स्त्री’चे दर्शन त्यातून घडते.
जन्म-मृत्यू, श्रद्धा-अश्रद्धा, न्याय-अन्याय, साफल्य-वैफल्य यांच्यातील गुंतागुंतीचे भान ठेवत; मानवी अस्तित्व, संस्कृती व मूल्यविचार या अनेकविध संदर्भातील स्वत्वाचा शोध हे या कथेचे बलस्थान आहे. मोजक्या, अर्थपूर्ण प्रतिमांमुळे, कथेला चिंतनाचा अंतःप्रवाह लाभलेला आहे. नित्यनूतन असणार्या जीवनाकडे पाहण्याच्या विविध दृष्टी त्यातून सूचित झाल्याआहेत. म्हणूनच, (कथानिर्मितीचे अर्धशतक पार करणार्या) विजया राजाध्यक्ष यांचा समांतर हा नवा संग्रह म्हणजे त्यांच्या परिपक्व प्रतिभाशक्तीचा संपन्न आविष्कार होय असे म्हणावेसे वाटते.