Summary of the Book
बदलत्या ग्रामजीवनाचे आजचे समाजवास्तव म्हणजे प्रभाकर शेळके यांचा 'व्यवस्थेचा बइल' हा कथासंग्रह, शहरी संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेली परमीटरूम, बिअरबार, दूरदर्शन वाहिन्या, लॅपटॉप, स्मार्ट झालेला मोबाईल या नव्यानं निर्माण झालेल्या गरजा अत्यावश्यक झाल्या. त्यानं फक्त खेड्याचेच नव्हे तर ग्रामजीवनाचे शहरीकरण झाले. आजकरण्यांनी स्वतःच्या 'अर्था'शी निगडीत विकासासाठी आम्ही ग्रामीण जनतेचा विकास करतो. असा आभास निर्माण केला. समाजाची मानसिकता बदलली. शासकीय पातळीवर मिळणाऱ्या सुखसोयी, कर्जमाफी, बँककर्ज, स्वस्तदरात मिळणारे अन्नधान्य या आणि या सारख्या अनेक सवलतीमुळे ग्रामीण तरुणाई निष्क्रिय झाली. त्याची कामधंदा करण्याची इच्छाशक्ती दुबळी झाली. त्यात राजकारण्यांनी या तरुणाईला नवीन फसव्या जगण्याच्या आमिषात बुडवून टाकले. त्यांच्या बाटलीची सोय झाली की हे तरुण '.....की जय' म्हणायला तयार....नोकरीच्या हव्यासापोटी हा बहकलेला तरुण बेकरीचं ओझं खांद्यावर घेऊन दिशाहीन प्रवास करू लागला. हे आणि असेच बदललेल्या ग्रामजीवनाचे चित्रण समर्थपणे प्रभाकर शेळके आपल्या कथेतून मांडतात. तरुणाईची घुसमट, अवहेलना, दारिद्र्य यांचे चित्रण करताना विविध पातळीवर होणारी पिळवणूक आणि राबवणूक अत्यंत संयमी शब्दांत कोणतेही आकांडतांडव न करता समर्थ ग्रामीण भाषेत शेळके मांडतात. त्यांच्या कथेतून आलेल्या वास्तवाला आत्मानुभूतीचा मुलाधार आहे.