Summary of the Book
'कवितेला तू कसकसले पर्याय बनवणार आहेस ?' त्याने विचारले.' कविता ही आयुष्याला इतकी व्यापून आहे की, तिला पर्याय बनवणारी मी कोण?, तिने सहज सांगितले. स्वत: च्या अस्तित्वाचा असा काटेकोर पंचनामा सतत मांडणारी ही जीवघेणी सोबत तुला हवी तरी कशाला ? ' सोबत तिची मला नव्हे, आता माझी तिलाच! माझ्याशिवाय ती इतरत्र जाणार तरी कुठे?' छाया कोरेगावकरचा संग्रह वाचताना असा व्याकुळ संवाद तुम्हाला सतत ऐकू येईल. तिच्या कवितांमागची एक निरंतर चालणारी धडपड तीच आहे. अगदी स्पष्टपणे ऐकू येणारी जगण्याची आत्यंतिक असोशी ज्याप्रमाणे कधी कधी निराशेच्या गडद तळ्यात उतरायला भाग पाडते, त्याचप्रमाणे प्रेमावरची नितांत श्रध्दा, बऱ्याचदा वास्तवाच्या घनगर्द वाळवंटावर पाऊल उमटवणे अटळ बनवते. ( हो, हो, छायाच्या कवितेत वाळवंटही घनगर्द बनुन येते ! ) छाया कोरेगावच्या कविता जगण्याच्या वाळवंटावर उमटलेल्या अटळ पाऊलखुणा आहेत. वर वर आठवणीत गुंतलेली कवयित्री आपल्याला भासमान होते. पण नंतर लगेचच, वर्तमानात अडकलेले तिचे आस्तित्वही आपल्याला जाणवू लागते. छायाच्या कवितेची हीच मोठी ताकद आहे. जगण्याचा इतका पारदर्शक व्यवहार फार विरळा, फारच दुर्मिळ !
बाईपणाचे सुधारक सोंग घेणाऱ्या आजच्या तथाकथित स्त्रीत्वापेक्षा, छायाची श्रद्धाळू घुसमट खरी वाटते. छळ करणारी वाटते. त्यातून बाहेर पडायचे नी केवळ कागदावरची कसरत करीत कवितेची महिरप सजवायची असे ठरवले असते, तर आजच्या आघाडीच्या कावियत्रींमध्ये तिघेही नाव असते. कवितांना इतका साधा पर्याय बनवणे छायाला मान्य नाही आणि हेच तिच्या कवितांमागचे खरे श्रेय आहे. तेवढे आपण घ्यायला हवेच! तिची कविता अशीच अंधारातल्या अंकुरा सारखी वाढत राहील, हे तिच्या टचटचणारया कवितांतून जाणवत राहते. हा पण विश्वास, एरवी आपण तिच्या अंगणात रांगोळी घालण्यासाठी उतरतात. तिला आपण जमिनीवरची माणसं देणार तरी काय?
- ज्येष्ठ कवि अरुण म्हात्रे