Summary of the Book
आपले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून वास्तववादी लेखन करताना खेड्यापाड्यातील समय जीवनाचा चित्रदर्शी आलेख मांडण्यात श्री. सदानंद देशमुख यांची लेखणी यशस्वी ठरली आहे. एरवी सामान्य वाटणार्या स्त्री-पुरुषांना आपल्या लेखनाच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या भावविश्वात लीलया प्रवेश करून; त्यांचे जगण्याचे छोटे-मोठे प्रश्न, हर्षामर्ष, स्वप्न आणि स्वप्नभंग, त्यांची अभावग्रस्तता, संघर्ष, घुसमट, वेदना आणि विद्रोह यांचा भेदक वेध घेऊन वाचकांनाही या जगण्याचा ते प्रत्ययकारी परिचय करून देतात. अस्वस्थ करतात. ते स्वत: याच समाजघटकातून पुढे आलेले लेखक असून आजही त्यांचे वास्तव्य याच ग्रामीण भागात असल्यामुळे त्यांचे लेखन समकालीन ग्रामीण वास्तवाला शब्दस्वर देताना दिसते.
मानवी जीवनाबद्दल असणारा अंत:स्थ कळवळा आणि मानवाच्या सुखकारी जीवनाचा ध्यास; यामुळे सदानंद देशमुख यांचे साहित्य नैतिक उंचीवर जाते. काव्यात्म व संस्मरणीय अनुभूती देण्याची शक्ती ठेवते. त्यामुळेच विशिष्ट प्रदेशाच्या बोलीत लिहूनही संवादाची क्षमता असलेल्या; कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत वेग घेऊन येणार्या त्यांच्या ‘रगडा’ या संग्रहातील कथा आणि दीर्घकथा लक्षवेधी ठरल्या आहेत.
‘साहित्य अकादेमी’ आणि ‘जयवंत दळवी स्मृती पुरस्कार’ यांसारख्या साहित्यातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेले श्री. सदानंद देशमुख यांचा ‘रगडा’ हा कथासंग्रहही त्यांच्या विषयीच्या अपेक्षा वाढविणारा आहे.