Summary of the Book
एखाद्या प्रसंगाचं निमित्त होऊन अनेक लहान मुलं, परीक्षार्थी विद्यार्थी, जीवनातील यशापयशाबद्दल सचिंत असणारे तरुण आणि बदलत्या जगरहाटीत अस्वस्थ असणारे वृद्ध आपापल्या भाषेत बोलत असतात. आणि अंजलीबाईही सोप्या भाषेत त्या त्या विषयावर आपले विचार वाचकांसाठी व्यक्त करीत असतात. प्रत्येक उदाहरणांकडून त्यांच्या सारांशाकडे आणि त्यातून उपाययोजनेकडं जायचं हे `थेरपिस्ट’ मंडळींचं तसं एक ठरलेलंच लेखनतंत्र असतं- तेच याठिकाणीही आपल्याला आढळेल. परिणामाच्या दृष्टीनं त्यांनी सुचविलेली विचार हीच महत्त्वाची गोष्ट असते आणि वाचकही तीच लक्षात ठेवतो.
किंबहुना ह्याच सल्ला-मसलतीसाठी हे लिखाण वाचण्याकडे त्याचा आज अधिकाधिक कलही होतो आहे. शिक्षित व्यक्तीला आपल्या वा आपल्या भोवतालच्या माणसांच्या समस्या सर्वसामान्यपणे जाणवत असतात आणि त्यासंबंधात कोणी मार्गदर्शन केले तर ते हवंही असतं. कधी इतरांकडून असे मार्गदर्शन घ्यायची लाज वाटते, कदी तितके इतरांशी त्याचे जवळचे संबंध नसतात आणि कधी अहंभावही आड येतो. अशावेळी अनुभवी, ज्ञानी व्यक्तीनं केलेलं विवेचन वाचून स्वतःच स्वतःला मार्गदर्शन करून घेण्याची काहीची तयारी असते. ते आपण होऊन या प्रकारच्या पुस्तकांकडे वळतात. ती पुरेशा सखोलतेने लिहिलेली असतील तर त्यांना त्याचा फायदा होतोच.
-डॉ. सरोजिनी वैद्य यांच्या प्रस्तावनेतून