Summary of the Book
रसलिङगम् - सकारात्मक ऊर्जेचा वैश्विक स्त्रोत
सकारात्मक ऊर्जा - आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करण्याचे बळ देते, ना उमेदीच्या काळात उमेद देते, मुंगीलाही हत्तीचे बळ देण्याची शक्ती सकारात्मक विचारांमध्ये असते. मानवी जीवनामध्ये सकारात्मक उर्जेचे अनेक स्रोत आहेत. ही ऊर्जा कोणाला मंदिरातून भेटते. तर कोणाला तीर्थक्षेत्रांत भेटते, कोणाला पवित्र नदीच्या स्नानातून भेटते तर कोणाला सद्गुरुंपुढे नतमस्तक होऊन भेटते. कोणाला देवाच्या मूर्तीमधून भेटते तर कोणाला देवाच्या चित्रांमधून. एवढेच काय तर मनोभावे प्रतिष्ठापना करून प्राण ओतल्यानंतर दगडामधूनही सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. कोणी याला कर्मकांड म्हणेल अथवा आणखी काही म्हणेल पण हे सर्व करून जी ऊर्जा मानवाला प्राप्त होते, ती सर्वात मोठा जीवनाधार असते.
मानवाला पराकोटीचा नास्तिक बनून काहीही फायदा होत नाही आणि पराकोटीचा आस्तिक बननेसुधा चुकीचे आहे. म्हणून माणसाने स्वस्तिक बनावे. अशी माझे गुरु वैद्य श्री हरिश पाटणकर सरांची शिकवण आहे. सर्व गोष्टींकडे स्वस्तिक होऊन पाहिल्यास आयुष्य अगदी सोपे होऊन जाते आणि मनामध्ये आस्तिक किंवा नास्तिक विचारांचे द्वंद्व होत नाही.
पारद शिवलिंगाकडे ही अशाच स्वस्तिक नजरेने पहावं असे माझे स्पष्ट मत आहे. पारद शिवलिंगामुळे आपल्याला होणारे फायदे मी शास्त्राधार घेऊन सांगू शकतो पण सिद्ध करू शकत नाही. याची सिद्धता साधकाच्या मनातील शुद्ध भावामध्ये दडलेली आहे. या पारद शिवलिंगाबद्दल आणि त्यातील पवित्र ऊर्जेबद्दल तिळमात्र शंका मनात नसेल तर त्या व्यक्तिस ते नक्कीच फलदायी ठरेल. मी आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय शास्त्राचा एक सर्वसामान्य विद्यार्थी. आयुर्वेदाचार्य ही पदवी प्राप्त करून सर्वांप्रमाणे रुग्णसेवेमध्ये आयुष्य घालवणे इतकेच माझे स्वप्न होते. पण आपला जन्म काही विशेष कार्यांसाठी झालेला असतो आणि परमात्मा आपल्याला वेळोवेळी त्या कार्यांची कळत-नकळत जाणीव करून देत असतो. माझ्या रसविद्येतील प्रवासाची सुरुवात झाली ती, वैद्य हरिश पाटणकर प्रेरित, ज्ञानसंकुल विद्यार्थी संघ संचलित 'प्राचीन संहिता गुरुकुल' मधून गुरुकुलमध्ये रससिद्ध श्री अरुणकुमार महाराज यांनी बनवलेल्या रसलिंगाचे अद्भूत दर्शन घडले आणि त्याच क्षणी रसेश्वरांची उपासना करून ही विद्या आत्मसात करण्याचा ध्यास घेतला. ग्रंथांचे वाचन आणि विचारमंथन यातून यशप्राप्ती मिळाली. पारदास बद्ध करून त्याचे शिवलिंग बनवता आले.
हे यश अगदी लहान वयात प्राप्त केल्याने अनेक जाणत्या व्यक्तींकडून प्रशंसा मिळाली तसेच पुढील वाटचालीसाठी अनेकांकडून मार्गदर्शन ही मिळाले. पण अनेक लोकांना याविषयी खूपच कमी माहिती असल्याचे जाणवले. प्रत्येकास संपूर्ण माहिती भेटून किंवा फोन वरून सांगणे अवघड होते. पूस्तक हे या माहितीच्या प्रसारासाठी उत्तम प्रसारमाध्यम असल्याने ते लिहिण्याचा निर्णय गुरु सन्मतीने घेतला. माझे हे पहिलेच पुस्तक असल्याने जाणकार वाचकांकडून सल्ल्यांचे स्वागत आहे. माझ्या या शास्त्रसेवेस तुमचा आशिर्वाद लाभो अशी आपणा सर्वांकडे विनंती. श्री रसेश्वरांच्या कृपेने आपणा सर्वांचे जीवन सुख, समाधान आणि आरोग्यमयी बनो हीच प्रार्थना..
- वैद्य ओमप्रसाद लक्ष्मणराव जगताप