Summary of the Book
यशोधराची कथा रूढ असलेल्या कालक्रमनिष्ठ पद्धतीने अवतरत नाही. ती अवतरते आत्मविष्काराच्या आत्ममग्न टवटवीत शैलीत.
तिचा हा अविष्कार त्या त्या वेळी घडणा-या आणि स्वाभाविक वाटणा-या लहानमोठ्या घटना-प्रसंगांतून पुढे सरकत असतो.
कथेतील दोन पात्रे एकमेकांना सहज भेटतात किंवा सामोरी येतात आणि त्यांच्यात संवाद सुरु होतो. त्या पात्रांचा मागचापुढचा संदर्भ लेखिका तिथल्या तिथे देत नाही. त्यामुळे पात्रांच्या नात्याला वाचकांच्या दृष्टीने धूसरता प्राप्त होते. त्यांची कथा वाचकाला आरंभापासूनच खिळवून ठेवते. त्यातूनच वाचकाची जिज्ञासा वाढत जाते आणि ती कथा पूर्ण वाचायची ओढच त्याला लागते.
या कथा महानगरीय तरुण स्त्रीमनाचे भावविश्व यशस्वीपणे रेखाटणारी शब्दशिल्पे झाली आहेत. स्वत:चेच एक कलात्म विश्व निर्माण करणा-या अशा या कथा इतर बहुतके स्त्रीवादी लेखिकांच्या कथांपेक्षा एकदम वेगळ्या आणि दर्जेदार वाटतात, कारण त्यांना कुठल्याही वादाचे, अभिनिवेशाचे, पुरुष-विरोधी धोपट रागलोभाचे तत्वज्ञान माहित नाही. त्या निरभिनिवेश आहेत. त्यांना फक्त कलात्मकतेचे सुजाण भान आहे. त्यामुळेच त्या अधिक प्रभावी वाटतात. वास्तव जीवन रेखाटणा-या, महानगरीय स्त्रीचा एकाकीपणा, एकटेपण टिपणा-या वाटतात. मराठी कथेच्या क्षेत्रात वेगळे दालन निर्माण करणा-या वाटतात.
आनंद यादव