Summary of the Book
जागतिकीकरणामुळे जग जवळ आलं आहे. दळणवळणाची साधनंही वाढली आहेत. त्यामुळे एका देशातून दुसऱ्या देशात जाणं फारसं कठीण राहिलेलं नाही. थोडेसे पैसे जवळ असले की आपली परदेशवारीची इच्छा पूर्ण होते. आपल्या देशाबरोबरच परदेशातील निसर्ग, तिथली संस्कृती अनुभवण्यासाठी अनेक जण परदेशी प्रवास करतात. पुष्पा जोशी लिखित ‘देशोदेशींचे नभांगण’ या पुस्तकात लेखिका आशिया व युरोपमधील विविध देशांची अनोखी सफर घडवून आणते. जपान, चीन, हॉंगकॉंग, मकाऊ, इजिप्त, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, फिनलॅंड, स्वीडन या देशांचा प्रवास करून लेखिकेने तिथली वैशिष्टय़े टिपली आहेत.
उगवत्या सूर्याचा देश असं ज्याला म्हटलं जातं त्या जपानमधल्या वास्तव्यात लेखिकेने तिथली कोणकोणती सौंदर्यस्थळं पाहिली, तिथला पाऊस, खाद्यपदार्थ यांचे वर्णन करतानाच एक स्वच्छ, सुंदर, शालीन राष्ट्र असा जपानचा उल्लेख केला आहे. इस्तंबूलला लाभलेला पारंपरिक वारसा, तिथला निसर्ग यांचं चित्रण लेखिका करते. चीनमध्ये फिरताना या देशाने केलेल्या प्रगतीमुळे लेखिका भारावून जाते. याचप्रमाणे ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, स्वीडन या देशांतील अप्रतिम निसर्ग, तिथल्या लोकांची शिस्त, स्वच्छता यांबद्दलही लेखिका सांगते. पुष्पा जोशी यांच्या ओघवत्या शैलीने हे पुस्तक वाचनीय झाले आहे.
देशोदेशींची अनोखी सफर वाचकांना घडवितानाच पुष्पा जोशी यांनी वाचकांना भारतातील पर्यटनस्थळांचंही दर्शन घडविलं आहे ते ‘चला आसामपासून अंदमानपर्यंत’ या पुस्तकातून. लेखिका भारतातील प्रेक्षणीय स्थळे, निसर्ग, त्या-त्या राज्यांतील लोकांची वैशिष्टय़े, खाद्यसंस्कृती यांचे दर्शन घडविते. या प्रवासादरम्यान विविधतेतील एकात्मता अनुभवल्याची कबुली लेखिका देते. भारतातील निसर्ग, इथली संस्कृती, लोकजीवन आणि अद्भुत कथांचा स्पर्श लाभलेल्या ठिकाणांनी भारावून गेल्याचं हे पुस्तक वाचताना जाणवतं. विशेषत: इथल्या धार्मिक स्थळांविषयी लेखिका अधिक आत्मीयतेने लिहिते. या पुस्तकातून भारताचं दर्शन घडतं.