Summary of the Book
सदगुरु श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अत्यंत गोड, मार्मिक आणि सर्वश्रुत असा अभंग आहे. श्रीमाउलींच्या अनेक विरहिणींपैकी ही एक नितांत सुंदर विरहिणी आहे. विरह हा भगवत्प्रेमाच्या अभिव्यक्तीच्या प्रकारांपैकी एक प्रकारचा गोपीभाव आहे. भगवंतांच्या भेटीसाठी अत्यंत व्याकूळ झालेल्या हृदयात प्रकट झालेले काव्य म्हणजे विरहिणी. मराठी संतसाहित्यात श्रीमाउलींची विरहिणी अत्यंत श्रेष्ठ दर्जाची मानली जाते.
हे पुस्तक म्हणजे श्रीमाउलींच्या या नितांत सुंदर विरहिणीचे प.पू.सौ.ताईंनी केलेले रसाळ निरूपण आहे. संपूर्ण अभंगात श्रीमाउलींनी कावळ्याला अनेक प्रकारांनी आर्जवाने विनंती केली आहे की, त्याने श्रीभगवंतांच्या येण्याचा निरोप श्रीमाउलींना सांगावा. प्रत्यक्ष भगवंतच पाहुणे म्हणून येत आहेत, ही गोड बातमी त्या कावळ्याने द्यावी, म्हणून माउली त्याला अनेक आमिषे दाखवीत आहेत. असा ह्या अभंगाचा सरलार्थ आहे.
परंतु ह्या विरहिणीतून माउली, ‘कावळा’ हे प्रतीक घेऊन, संपूर्ण कृपायोगच आपल्यासमोर मांडतात व प.पू.सौ.ताई आपल्या साध्या सोप्या शैलीत तो आपल्याला समजावून सांगतात.