Summary of the Book
अन्सार शेख पहिल्या प्रयत्नात, २१ व्या वर्षी, मराठी माध्यम घेऊन आयएएस (IAS) झाला, यापेक्षा अनेक दुर्बलतांचा सामना करत ज्या पद्धतीनं इथपर्यंत पोहोचला ते अधिक महत्वाच आहे. भारतात जात, वर्ग, लिंगभाव, धर्म, प्रदेश, भाषा इ. घटकांवर आधारित अत्यंत गुंतागुंतीचं, परस्पर व्याप्त आणि विषम स्वरूपाचं समाजवास्तव आहे. या विषम वास्तवान अनेक समाजघटकांना किमान पातळीवरील जीवन जगण्यासाठी आवश्यक क्षमता आणि संधी यांपासून वंचित ठेवलं आहे. परिणामी, त्यांना अनेक दुर्बलतांचा (Disabilities) सामना करत कुंठीतावस्थेतील जीवन जगावं लागतं.
मराठवाड्यासारखा मागास विभाग (जालना जिल्हा, शेलगावसारखं छोटं गाव) आणि मुस्लीम समुदायातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास स्तरातून आलेला अन्सार शेख जणू या घटकांचे प्रातिनिधिक रूपच आहे. अशा दुर्बल घटकांतील व्यक्तीला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून जगण्यासाठीच तीव्र संघर्ष करावा लागतो. जिथे जगण्यासाठीचा संघर्ष ऐरणीवर असतो, तिथं शिक्षण घेणं, उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणं आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचं ठरवण ही गोष्ट स्वप्नवतच. अन्सारने असं स्वप्न पाहिलं, या स्वप्नालाच आपल्या जीवन संघर्षाचे अविभाज्य अंग बनवलं आणि ते तडीस नेलं. भोवतालची व्यवस्था प्रतिकूल असूनही, न डगमगता अन्सारनं इथपर्यंत केलेला हा प्रवास अपवादात्मक ठरतो. म्हणूनच तो जाणून घेणं महत्वपूर्ण ठरतं.