Summary of the Book
ललितगद्य हे स्वतःत हरवून जाण्याचे हृदयस्थ ठिकाण; जगलेले पुन्हा पुन्हा जगणे हे या लेखनाचे, ललितरम्यतेच्याही फार पलीकडचे मनस्वी सूत्र असते. भौगोलिक, सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा समुचित संवेदनांची ती एक एकट्याची स्मरणसहल असते.
शिरीष गंधे यांच्या "वाती सांजफुलांच्या' या ललितगद्य संग्रहात एकवीस छोटे ललित लेख आहेत. या सगळ्या लेखांमागे एक सूत्र आहे. हे सूत्र आहे आठवणींचे. निमित्तांचा धागा धरून लेखकाचे गत आयुष्य शब्दांमध्ये जिवंत सरसरत येते आणि एकेका निमित्ताभोवती एकेक रसरशीत, संदर्भसमृद्ध अवकाश निर्माण होते. हे अवकाश निर्माण करणारे तपशील आणि त्यांमध्ये गुंतलेले लेखकाचे भावविश्व यांच्यामुळे या लेखनात एक प्रकारचा गोडवा भरलेला आहे. त्याशिवाय या लेखांमधून मानवी संस्कृतीचेही दर्शन घडते.