Summary of the Book
संक्रमण म्हणजे काय? तर बदल, किंवा इंग्लिश मध्ये सांगायचं झालं तर transition अर्थात, एका स्थितीतून दुसर्या स्थितीत जाणे... आपण म्हणतो ना, मकर संक्रमण किंवा देश मोठ्या संक्रमण अवस्थेतून जात आहे वगैरे वगैरे.... हे संक्रमण म्हणजे रोगाचं होत असतं तसला काही प्रकार इथे नाही....
आता हे संक्रमण कुठे, कोणासोबत कसं घडत आहे याबद्धल ह्या कादंबरीचा विषय निगडीत आहे... २०१४ साली भारतात लोकसभा निवडणुका झाल्या अन त्याचे निकाल काय आहेत हे देशासमोर आहेतच... नरेंद्र मोदी स्वपक्षीय बहुमताने पंतप्रधान झाले... नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी आश्वासनांचे डोंगर उभे केले होते अन त्यातील काही पूर्ण होत आहेत तर अजून बरीचशी अजूनही आश्वासणेच आहेत...
कॉंग्रेसची सत्ता जाऊन भाजपचं अर्थात मोदींचं सरकार आलं... नंतर अनेक राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होत गेला... निवडणुका झाल्या, सरकारं स्थापन झाली पण देशातील जनतेच्या आयुष्यात नेमका काय फरक पडला??? केवळ सामान्य माणसाच्याच नव्हे तर गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय माणूस असोत मग त्यात शेतकरी, व्यापारी, नोकरदार माणूस असो यांच्या आयुष्यात नेमका काय बदल घडला? देश-राज्यातील सत्ताबदलानंतर कोण सुखावलं, कोण दुखावलं याचं मोजमाप अजूनही चालूच आहे... आणि मुख्य म्हणजे दिल्लीतील राजकरणामुळे गल्लीतील राजकरणावर काय परिणाम झाले???
वरील सगळ्या गोष्टींचे प्रातिंनिधिक उदाहरणे घेऊन काल्पनिक पात्रे रंगवून घटनांचा क्रम रचण्यात आला आहे तो म्हणजे संक्रमण!!! यात दोन मुख्य प्रातिंनिधिक उदाहरणे घेतली आहेत ती म्हणजे शेती अन शेयर मार्केट. ही दोन क्षेत्र दोन टोकांची वाटत असली तरी त्यांच्यातही काही साम्य आहेतच. राजकरणात घडणार्या घडामोडींचा या क्षेत्रांवर नेमका काय परिणाम होत जातो यावर कादंबरीचा मुख्य विषय आहे.
केतन नावाचा तरुण शेयर मार्केट क्षेत्राशी निगडीत आहे तर श्रीपाद हा त्याचा जवळचा मित्र शेती क्षेत्राशी निगडीत आहेत. राजकरणात घडणार्या घटनांचा यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो त्यावर एक मुख्य घटनांचा क्रम आहे. त्यात मग त्या दोघांची जिवलग मैत्री, त्यांचे काही किस्से आहेत. केतनचा मार्गदर्शक आणि शेयर मार्केट ब्रोकर, हरिभाऊ रानडे नावाचा एक पात्र आहे, जो त्याला नेहमी काहीतरी सल्ले देत असतो. दुसरीकडे जयवंत नावाचा श्रीपादच्या गावातील सामान्य राजकीय कार्यकर्ता श्रीपादला काय शिकवतो हाही महत्वाचा भाग आहे.
वरील भाग झाला घटनांचा एक क्रम. दुसरीकडे राष्ट्रीय, राज्यस्तरीय अन स्थानिक राजकारणाचा पट दाखवण्यासाठी वेगळ्या घटना आहेत. यात भारताचे पंतप्रधान माधवलाल प्रेमजी नावाचा राजकरणी आहे, त्यांना सक्षमपणे रोखू पाहणारा अन तितक्याच ताकतीचा बुजुर्ग असा विरोधी पक्षांचा नेता म्हणजे विठ्ठल पंडित! शेवटपर्यंत संशयाच्या भोवर्यात राहणारे गोविंद सोनवणे, बलवंतराय ठक्कर; केंद्रीय राजकारणातील सामान्यपणे दिसणारे इतर चेहरे म्हणजे जगदीश त्यागी, तस्लिमा खान, चिंताराम दांडे, ज्योती मिश्रा आणि अजून बरेच; स्थानिक राजकारणी आमदार लुकतुके... असे पात्र आहेत राजकीय पटलावर... आता ह्या राजकीय नेत्यांचे निर्णय, अर्थात स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणा किंवा इतर कारणांमुळे, देशातील विविध क्षेत्रांवर काय पद्धतीने परिणामकारक ठरतात अशा घटनांचा एक क्रम आहे.
टीप: वर नमूद केलेले काल्पनिक राजकीय पात्र जर तुम्हाला आजच्या राजकारणातील नेत्यांशी मिळते-जुळते वाटत असतील तर समजा तुमची राजकीय जाण उत्तम आहे; कारण कादंबरी लिहिताना माझ्या डोळ्यासमोर आजच्या खर्या राजकीय पटलावरील अनेक पात्र होतेच होते!
मूळ कथानक असं आहे.यात मग उप-कथानक, सहाय्यक पात्रे आणि घटना आहेतच. थोडेसे विनोदी, भावनिक, उत्कंठावर्धक वगैरे प्रसंग आहेतच. मुख्य कथानकाला जोडून कथानक सांगायचे झाले तर केतन-श्रीपाद या मित्रांमधील संबंध, केतन व त्याचे कौटुंबिक संबंध अशा अनेक घटना कादंबरीच्या मुख्य कथानकाशी संलग्न आहेत.
अशी आहे संक्रमण कादंबरी! एकदा जरूर वाचा. तुमच्या संग्रहात ठेवण्यासारखी आहे का नाही हे तुम्हीच ठरवू शकता.