Summary of the Book
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे समाजउद्धाराचे काम केले आहे या त्यांच्या कामात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचे फार मोठे योगदान आहे. रमाई यांनी बाबासाहेबांना जीवनभर साथ देऊन त्यांना उच्च शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रसंगी उपाशी राहून, गवऱ्या वेचून आपल्या संसाराचा गाडा चालविला. त्यांच्या जीवनात अनेक दु:खद प्रसंग आहे. आपल्या काही मुलांचा मृत्यू, रामजी सुभेदार यांचा मृत्यू या साऱ्या घटना त्यांनी पोटात घालून बाबासाहेबांना तसूभरही कमी पडू दिले नाही. बाबासाहेब दु:खी होऊ नये म्हणून त्या स्वतः चांदणप्रमाणे झिझल्या. त्यांच्या झिझण्यामुळेच बाबासाहेब समाजहित साधू शकले आणि आज या रमाईच्या त्यागामुळेच आंबेडकरी समूहाला चांगले दिवस पाहायला मिळाले. या रमाईच्या त्यागाचे, त्यांच्या बलिदानाचे, त्यांच्या कष्टाचे, बाबासाहेबांना दिलेल्या साथीचे वर्णन म्हणजे हे पुस्तक.
लेखक के. एस. लोखंडे यांनी अत्यंत कष्टपूर्वक माता रमाईच्या जीवनातील अनेक प्रसंग अभ्यासून या पुस्तकाची मांडणी केली आहे. या पुस्तकात रमाईच्या अनेक आठवणी, बाबासाहेबांच्या सोबतची त्यांची संसार सोबत हे व असे अनेक प्रसंग आपणास अनुभवता येतात. हे प्रसंग वाचताना अश्रू तराळतात. या पुस्तकाला लेखकांनी 'हिमालयाची सावली : रमाई' असे नाव देऊन खरे अर्थाने रमाईचे मोठेपण किती होते हे मांडले आहे. हे पुस्तक म्हणजे माता रमाईच्या संघर्षमय जीवनाचा सारीपाठ आहे.