Summary of the Book
मिरज संस्थांचे सरदार पटवर्धन यांच्या राजकीय कारकिर्दीवरची "उदयास्त" ही चरित्रात्मक कादंबरी आहे. जशी उत्तरेत शिंदे, होळकर, पवार, ही घराणी बाजीराव पेशवे कालात उदय पावली, तसेच पटवर्धन घराणे हे थोरल्या माधवरावांच्या काळात स्वराज्याच्या दक्षिण सीमेचं रक्षण करायला पराक्रम गाजवत होते. कोकणातल्या कोतवड्याच्या एका सामान्य भिक्षुकाच्या मुलाने, हरभटाने गणपतीपुळ्याच्या गजाननाची तपस्या करून सिद्धी प्राप्त केली. गणराजाने दाखवलेल्या मार्गाने हरभट कोल्हापुरात येऊन, संताजी घोरपड्यांच्या मानास्पुत्राच्या - नरो महादेवांच्या पाठबळाने प्रथम बहिरेवाडीला स्थिरावले. त्यांना सात पुत्र झाले. त्यातील त्यांचे चार पुत्र त्र्यंबक हरी, रामचंद्र हरी, गोविंद हरी व भास्कर हरी हे बालाजी विश्वनाथाच्या काळात पेशव्यांच्या घरात रुळले. बाजी-चिमाजींबरोबर युद्धशास्त्राचे धडे घेऊन त्यांच्याबरोबर स्वार्या - मोहिमांचे अनुभव मिळवू लागले. बाजीरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशवे आणि नंतर माधवराव पेशवे यांचे खंदे समर्थक म्हणून राजकारणात वावरु लागले. पानिपतानंतर विस्कटलेली राज्याची घडी बसवतांना घरातले विरोधक राघोबादादा, कर्नाटकातील शत्रू - हैदर, निजाम आणि इंग्रज यांच्याशी टक्कर देण्यासाठी पटवर्धन पुरुषांच्या पराक्रमाचा भरपूर उपयोग माधवराव पेशव्यांनी करून घेतला. त्यासाठी, त्यांना कर्नाटकाच्या सीमेवरील मिरजेची सनद देऊन तेथील सरंजाम दिला. पुढल्या पिढीत या चौघांच्या पुत्रांनीही तलवार गाजवली. गोपाळ गोविंद, परशुरामभाऊ आणि सांगलीचे चिंतामण आप्पा यांनी पुणे दरबारातल्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. हरभटांच्या भावांच्या पुत्रांनीही हाती पंचपाळी न घेता तलवारच उदरनिर्वाहासाठी निवडली.
अशा या प्रतापी घराण्याचा चरित्रात्मक परिचय म्हणजे ही कादंबरी.