Summary of the Book
पुरोगामी महाराष्ट्र घडण्यामागील प्रबोधनाची वैभवशाली परंपरा थेट संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम ,संत एकनाथ ,संत नामदेव ते चोखामेळा ,संत जनाबाई पर्यंत एकूण वारकरी चळवळीने व्यापली आहे. याच परंपरेचा वसा आणि वारसा घेऊन संपूर्ण विश्वाला वंदनीय ठरावी ,अशी थोर शिकवण आणि आचारसंहिता जपणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ; याच परंपरेला पुढे नेणारे महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज ,डॉ .बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रात वैचारिक प्रबोधन घडविणारे आगरकर, न्या.रानडे,लोकमान्य टिळक,नामदार गोखले ,महर्षी शिंदे ,जेधे-गाडगीळ व समग्रतेने भान जपणारे यशवंतराव चव्हाण इ.च्या थोर वैचारिक व समग्रतेच्या मांडणीतून घडलेला महाराष्ट्र आज वेगळ्या वळणावर असल्याचा खेद वाटतो .आजच्या स्थितीत आलेली संकुचित असहिष्णुता ,अनैतिकता, वृद्धिंगत झालेली जातीयता ,भ्रष्ट नेतृत्व, नेतृत्वाचे खुजेपण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण ,समाजात येऊ घातलेली बेरोजगारी, भकास होत असलेली ग्राम व्यवस्था, वृद्धीसोबत शहरांना आलेला बकालपणा, त्यातून झालेली वाताहत. शेती अर्थव्यवस्थेतील अनिर्बंध, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; यामुळे समाजासोबत समाजाचा घटक असलेला माणूस भयग्रस्त, झाला आहे.या भयग्रस्त अवस्थेमुळे मानसिक संतुलन गमावल्यासारखी स्थिती निर्माण होऊन स्वातंत्र्य असून तो भयग्रस्त ,निराधार झाला आहे.या दृष्टचक्रातून महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला बाहेर काढण्यासाठी माणूस घडविण्याची प्रक्रिया आरंभली पाहिजे.