[10:44 am, 30/4/2024] Rajendra ghadge:
अभिप्राय...
विमानानं टेक ऑफ घेतलं आणि केबिनच्या लाईट धीम्या झाल्या. माझ्या हातात पुस्तक पाहून हवाई सुंदरी आली आणि तिनं मला वरची लाईट लावून दिली. त्या लाईट मध्ये माझ्या हातातल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ चमकू लागलं. पहिलं मनोगताचं पान उघडलं आणि ते वाचता वाचता उत्सुकता चाळवली गेली. पहिली कथा वाचायला घेतली आणि माझं मलाच भान उरलं नाही ! दोन तासांच्या प्रवासानंतर विमान जेव्हा जमिनीवर उतरलं तेव्हा मी शेवटचं पान वाचत होतो. खाली उतरण्यासाठी जेव्हां उठलो तेव्हा मान अवघडल्याची जाणीव झाली. १३९ पानांचं पुस्तक मी सलग दोन तास वाचत होतो ! हे माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होतं. ही किमया होती त्या पुस्तकाची. नाव होतं वृंदा, आणि लेखिका सौ. कांचन अभिजित बाबर - जाधव.
पुण्याच्या गमभन प्रकाशनने फेब्रुवारी २०२२ ला प्रकाशित केलेलं हे नवं कोरं करकरीत पुस्तक. लेखिका ही तेवढीच नवी कोरी. त्यांचं हे पहिलंच पुस्तक. पण पहिल्या कथेपासून ते शेवटच्या कथेच्या शेवटच्या शब्दांपर्यंत त्यांचं नवखंपण कुठंही जाणवत नाही. एखाद्या कसलेल्या लेखकाप्रमाणे त्या शब्दशिल्प उतरवत गेल्या आहेत आणि वाचकाला प्रत्येक कथेत गुंतवून ठेवण्याची कला त्यांनी बरोबर साधली आहे.
सहजसोपी भाषा शैली, खुलवत नेलेले प्रसंग, व्यक्तिरेखांच्या अंतरंगात डोकावून त्यांचं बाहेर काढलेलं मन यात नकळत आपणही गुंगून जातो. कसलेल्या लेखिकेप्रमाणे सौ. कांचन यांनी प्रत्येक कथेत प्राण ओतून तिला सजीव केली आहे. वृंदा या त्यांच्या पुस्तकाचं शिर्षक असणाऱ्या कथेत त्या लिहितात,
' तिला वाटायचे शरीराचे सौंदर्य कितीही वाढवायचे ठरविले तरी एका विशिष्ठ मर्यादेपुढे आपण ते वाढवू शकत नाही आणि शेवटपर्यंत टिकवूही शकत नाही परंतु मनाचे सौंदर्य जितके वाढवू तितके वाढते आणि काळा बरोबर त्याचे सौंदर्यही घटत नाही.'
लहानमोठ्या अशा या संग्रहात एकूण नऊ कथा आहेत. यातल्या काही कथांवर चित्रपट बनू शकतो एवढी ताकद या कथांमध्ये आहे. मला विशेष भावली म्हणजे निखळ मैत्री ही कथा. माणसं जोडण्याचं व्यसन असणाऱ्या तिला जेव्हा स्वतःवर निर्णय घ्यायचा प्रसंग येतो तेव्हा ती मैत्री बाजूला ठेवून स्वतःच्या भावना जपते. परंतु समोरून जेव्हा मैत्रीण मैत्र जपते तेव्हा तिला जाणीव होते ती निखळ मैत्रीची!
या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान लाभले आहे त्यामुळे एवढ्या मौल्यवान पुस्तकाची किंमत तशी माफक आहे. तेव्हा सर्वांनी आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावा असा हा कथासंग्रह आहे.
हा कथासंग्रह लिहिल्याबद्दल लेखिकेचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. अशीच नवनवीन पुस्तके लेखिकेच्या कल्पनाशक्तितून जन्म घेवोत ही सदिच्छा. लेखिका सौ. कांचन बाबर - जाधव यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
कथा संग्रहाचे नाव : वृंदा
लेखिका : सौ. कांचन अभिजित बाबर - जाधव
[10:44 am, 30/4/2024] rajendra ghadge