Summary of the Book
प्रकाशिकेचे निवेदन
रामायणातील व्यक्तिदर्शन समजून घेतल्याशिवाय महात्मा गांधींची रामराज्याची कल्पना समजत नाही. प्रभु श्री रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे. मनुष्य जास्तीत जास्त किती चांगला असू शकतो याची सीमा दाखवणारा तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. अशा प्रभू रामचंद्रावर विद्वानांनी जे आक्षेप-आरोप घेतले आहेत, त्यांना न्या. राम केशव रानडे यांनी वाल्मीकी रामायणाच्या आधारे मुद्देसूद उत्तरे दिली आहेत.
एकाद विद्वानांच्या परिसंवादात रामायणावर आक्षेप घेण्यात आले व नंतर अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्राचे एक न्यायमूर्ती म्हणाले की रामाला मी पुन्हा चौदा वर्षे वनवासाची शिक्षा देतो.
ही हकिकत वृत्तपत्रांत आल्यावर खूप लोकांनी आम्हांस सांगितले की वाल्मीकी रामायणातील भरपूर संस्कृत आधार देऊन जर कोणी साधार सविस्तर ``रामायणातील व्यक्तिदर्शन’’ हे पुस्तक लिहिले, तर ते पुस्तक लोकांना अमृताप्रमाणे वाटेल. असे पुस्तक कोण लिहून देईल याबद्दल आम्ही विचार करत असताना बर्याच लोकांनी आम्हांस सांगितले की जर राम केशव हे काम करण्यास तयार होतील तर सोन्याहून पिवळे होईल. त्याप्रमाणे आम्ही न्या. रानडे यांना विनंती केली असता रामाची सेवा म्हणून त्यांनी हे काम आनंदाने केले. योगेश्र्वर कृष्णाने स्वप्नांत संदेश दिल्यामुळे न्या. रानडे व्याख्यान, प्रवचन, पुस्तक, लिखाण याबद्दल कधीही मानधन न घेता विद्यादान करत असतात.
आम्ही मोठ्या भावभक्तीने हे पुस्तक प्रकाशित करत आहोत. प्रत्येक सुशिक्षित स्त्री-पुरुषाने वाचलेच पाहिजे अशा हा ग्रंथ आहे. वाचकांनी या पुस्तकाचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करावा आणि प्रपंच व परमार्थ साधावा इतकीच वासना, कामना नि याचना.
हे पुस्तक लिहून घेण्याचे काम श्री. कृ. ऊर्फ नाना पेठे यांनी केले. न्या. रानडे पहाटे 5।। ते सकाळी 8 वाजेपर्यंत तोंडाने मजकूर सांगत असत व रा. पेठे तो मजकूर उतरून घेत असत.
आपले जीवन सुखकारक, मंगलकारक व कल्याणकारक होण्याकरता भू-लोकीचे अमृत असणार्या वाल्मीकी रामायणातील व्यक्तिदर्शनाचा उपयोग होतो. लोकांच्या आग्रहाखातर आम्ही हे पुस्तक प्रकाशित करत आहोत. आमची ही सेवा रामाच्या चरणी रुजू होवो व लोक ती गोड करून घेवोत इतकीच प्रार्थना!
-सौ. निर्मला विद्याधर आवटी