Summary of the Book
'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग !
गडकोट हेच राज्य,
गडकोट म्हणजे राज्याचे मूक, गडकोट म्हणजे खजिना,
गडकोट म्हणजे राजलक्ष्मी, गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे,
गडकोट म्हणजे सुखनिद्रागार,
किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राणसरंक्षण !'
महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश. या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले किल्ले अन्यत्र कुठेही आढळत नाहीत. इतिहास, भूगोल, पर्यटन, संस्कृती, कला आणि सरंक्षण अशा कितीतरी अंगांनी या किल्ल्यांचे आजच्या तरुणाईशी नाते जुळलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांच्या बळावर स्वराज्य स्थापित केले, ते किल्ले बराच काळ विस्मृतीत गेले होते, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. इंग्रजांनी १८८५-८६ मध्ये गॅझेटिअर बनवले. याच 'गॅझेटिअर' चा अभ्यास करून बरोबर सव्वाशे वर्षांपूर्वी दळणवळणाची काहीही साधने नसताना केवळ किल्ल्यांची भ्रमंती व त्यांचा अभ्यास करण्यासाठी मैलोनमैलांची पायपीट करून, ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता चिंतामण गंगाधर गोगटे या एका मराठी माणसाने 'महाराष्ट्र देशातील किल्ले' हे पुस्तक दोन भागात लिहिले आणि हे पुस्तक 'किल्ले' या विषयावरील आद्य पुस्तक ठरले. गोगटे यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकातील वर्णने आजही अचंबित करतात. गडांना त्यांचे लाकडी दरवाजे शाबूत आहेत. तट-बुरुज ताठ मानेने उभे आहेत. सदर किंवा किल्लेदाराच्या वाड्यावर सव्वाशे वर्षांपूर्वीपर्यंत राबता सुरु होता. त्यामुळे आजसुद्धा ही माहिती वाचताना मजेशीर वाटते आणि किल्ल्यांकडे आपसूकच आपण खेचले जातो. आजकालच्या तरुणाईला किल्ले अभ्यासपूर्ण भटकण्याचे वेड लागले आहे. किल्ले भटकंती करणाऱ्या सर्वच वयोगटातील दुर्गप्रेमींसाठी सदर पुस्तक मैलाचा दगड ठरेल, यात काहीच शंका नाही.